मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:24 IST2025-12-16T15:20:30+5:302025-12-16T15:24:13+5:30
Manoj Jarange Patil Delhi Tour: मनोज जरांगे पाटील दिल्लीत पोहोचल्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
Manoj Jarange Patil Delhi Tour: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, शाळकरी मृत शौर्य पाटील मृत्यूप्रकरणी महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आश्वासन दिल्याचे समजते. खासदार निलेश लंके यांच्याकडून अमित शाह यांना पत्र देण्यात आलं असता, याबाबत माझ्याकडे शरद पवार यांचेही पत्र आल्याचे अमित शाह यांनी सांगितले, अशी माहिती देण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी घेतली शौर्य पाटील कुटुंबियांची भेट
एकीकडे महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील शौर्य पाटील कुटुंबाच्या भेटीला गेले. मनोज जरांगे यांना भेटताच शौर्य पाटील याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. अमित शाह यांनी पाटील कुटुंबीयांवर मरणोत्तर अन्याय होऊ देऊ नये. शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास मिशनरी शाळेचे जे फादर आहेत त्यांनी दखल घ्यावी. मी अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही लक्षात घ्या. नरेंद्र मोदी यांनीही लक्ष दिले पाहिजे. मुंबई आम्ही बंद करू शकतो, आमच्या मुलाचे बलिदान वाया जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, अमित शाह यांनी आरोपीला ८ दिवसांत अटक करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल. मराठ्याचे लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाही का? महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असले की मुख्यमंत्री कारवाई करतात, मग केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाही? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.