कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया मनमोहन सिंग यांनीच रचला - काँग्रेस
By Admin | Updated: March 11, 2015 14:54 IST2015-03-11T14:41:48+5:302015-03-11T14:54:14+5:30
मोदी सरकारच्या काळात सुरु असलेल्या कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच रचला होता असे सांगत काँग्रेसने सिंग यांची पाठराखण केली आहे.

कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया मनमोहन सिंग यांनीच रचला - काँग्रेस
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - मोदी सरकारच्या काळात सुरु असलेल्या कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच रचला होता असे सांगत काँग्रेसने सिंग यांची पाठराखण केली आहे. भूसंपादन विधेयकावरुन दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपानेच मनमोहन सिंग यांना कोळसा घोटाळ्यात गोवले असा गंभीर आरोपही काँग्रेसने केला आहे.
कोळसा घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजावले आहे. यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत मनमोहन सिंग यांचा बचाव केला. २००५ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांनी १९९३ पासून सुरु असलेल्या कोळसा धोरणात महत्त्वाचे बदल केले असे सुरजेवाला यांनी सांगितले. १९९३ पासून कोळसा खाणींचे वाटप केले जात होते. पण मनमोहन सिंग यांनी ही पद्धत बंद करुन जाहिरातींद्वारे कोळसा खाणींचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली असा दावाही काँग्रेसने केला आहे. मनमोहन सिंग यांच्या निर्णयाला भाजपाशासीत राज्यांनीच प्रखर विरोध दर्शवला होता. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिमबंगाल, झारखंड या राज्यांचा समावेश होता असे सुरजेवाला यांनी निदर्शनास आणून दिले. मनमोहन सिंग हे प्रामाणिक आणि पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात असे सुरजेवाला यांनी नमूद केले.