ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्यात ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
२०१३ मध्ये पश्चिम बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळा उघड झाला होता. सुमारे २५०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात कंपनीने गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले पण त्यांना योग्य मोबदला दिलेला नव्हता. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची चौकशीही होती. घोटाळ्याचे पाळेमुळे आसाम व ओदिशा या भागातही पोहोचले होते.पश्चिम बंगाल व अन्य दोन राज्यांचे पोलिस या घोटाळ्याचा तपास करत होते. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर निर्णय दिला. कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयनेच करावा असे आदेश दिले असून प.बंगाल, आसाम व ओदिशा येथील पोलिसांनी सीबीआय तपासासाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती सीबीआयला उपलब्ध करुन द्यावीत असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच शारदा कंपनी व ओदिशातील ४४ अन्य कंपन्यांचीही सीबीआयनेच चौकशी करावी असेही कोर्टाने सांगितले आहे.