11 Mar, 26 11:50 PM
मोठी बातमी: जम्मूमध्ये फारुख अब्दुल्ला यांना लक्ष्य करून गोळीबार, उपमुख्यमंत्री जखमी
जम्मू-काश्मीरमध्ये आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरामध्ये असलेल्या हॉटेल पार्कमध्ये आयोजित विवाह सोहळ्यामध्ये गोळीबार झाला. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे ज्येष्ठ नेत फारुख अब्दुला यांना लक्ष्य करून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारानंतर फारुख अब्दुल्ला हे सुरक्षित आहेत. तर गोळ्यांचे छर्रे लागल्याने जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी हे जखमी झाले आहेत.
11 Mar, 26 10:13 PM
इराणसोबतचं युद्ध लवकरच संपेल, लक्ष्य करण्यासाठी तिथे काही उरलेलं नाही - डोनाल्ड ट्रम्प
इराणसोबतचं युद्ध लवकरच संपेल, आता लक्ष्य करण्यासाठी तिथे काही उरलेलं नाही, असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचं युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत.
11 Mar, 26 08:33 PM
राज्य सरकारकडून तीन प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या
- कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती
- पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सहसचिव, बापू पवार यांची महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती
- महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड यांची पीएमपीएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
11 Mar, 26 07:19 PM
'अध्यक्षांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे दुर्दैवी'- अमित शाह
अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, "जेव्हा सभागृहाच्या प्रमुखाच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उभे केले जाते, तेव्हा जगासमोर भारताच्या लोकशाहीची प्रतिमा मलिन होते. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जो प्रकार घडला, तो पाहता त्यांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली होती."
11 Mar, 26 05:50 PM
विरोधकांना बोलण्यापासून रोखलं नाही - अमित शाह
आम्ही कधीही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधकांना बोलण्यापासून रोखलं नाही - अमित शाह
11 Mar, 26 05:40 PM
अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणं ही खेदाची बाब - गृहमंत्री
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणं सामान्य घटना नाही. ही खेदाची बाब आहे. अध्यक्ष कुठल्याही एका पक्षाचा नसतो. तुम्हाला हवं होते तर पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून पाहायचा होता. परंतु अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव योग्य नाही अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना फटकारले आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर ते बोलत होते.
11 Mar, 26 05:36 PM
मोठा दिलासा! दोन नवे एलएनजी कार्गो भारताकडे रवाना; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची माहिती
देशातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी नवी दिल्लीत एक महत्त्वाची माहिती दिली. "आमच्या गॅस कंपन्यांनी नवीन स्रोतांकडून एलएनजी कार्गो खरेदी केले असून, दोन मोठे कार्गो भारताच्या दिशेने येत आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले. या नवीन पुरवठ्यामुळे देशातील गॅस टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
11 Mar, 26 04:58 PM
मुंबईत भरदिवसा २८ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या
मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका अज्ञात व्यक्तीने २८ वर्षीय फालुदा विक्रेत्याची चाकूने वार करून हत्या केली. मंगळवारी संध्याकाळी मानखुर्दच्या मांडला परिसरातील एका हॉटेलजवळ ही घटना घडली आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. का पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव वाहिद शेख (२८) असे आहे. हल्ल्यानंतर त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
11 Mar, 26 04:54 PM
स्ट्रेट होर्मुझमध्ये मालवाहू जहाजावर हल्ला
दुबईहून काल रात्री निघालेल्या एका थाई मालवाहू जहाजावर पर्शियन आखातातील होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हल्ला झाला. या जहाजावर एकूण २३ क्रू मेंबर्स होते आणि यातील तिघे जण बेपत्ता आहेत.
11 Mar, 26 03:41 PM
संकटकाळात भारत तुम्हाला एकटे सोडणार नाही- पंतप्रधान मोदी
"पश्चिम आशियातील सद्यस्थितीमुळे तुमची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. तिथे आपले लाखो भारतीय बांधव काम करत आहेत. मात्र, आज देशात भाजप-एनडीए सरकार आहे. जेव्हा जेव्हा आपला कोणताही नागरिक संकटात सापडला, तेव्हा त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही आमची संपूर्ण ताकद लावली आहे. आजचा भारत आपल्या नागरिकांना संकटात कधीही एकटे सोडत नाही. युद्धाच्या परिस्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षा आणि सर्व शक्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न आजही सुरू आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
11 Mar, 26 03:17 PM
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल - मुख्यमंत्री
राज्यातील नदी जोड प्रकल्प वेगाने पुढे जात आहे. उल्हास खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात नेण्याबाबत रिपोर्ट आला आहे. ७८ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेता येणार आहे. ८७ हजार कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. पुढच्या ४ महिन्यात याचा डीपीआर बनवून प्रकल्पासाठी लागणाऱ्या मान्यता घेऊ. त्यातून मराठवाडा दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11 Mar, 26 03:13 PM
महाराष्ट्राने थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रिया या देशांच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं- मुख्यमंत्री
थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रिया या देशांच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र यूएई आणि सिंगापूरला मागे टाकेल. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान आहे. महाराष्ट्राचा विकासदर देशापेक्षाही जास्त आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली.
11 Mar, 26 03:11 PM
सोन्याच्या दरात तेजी, तर चांदी झाली स्वस्त
११ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) नुसार, आज ९९९ शुद्धतेचं सोनं १,६०,६९२ रुपये प्रति १० ग्रॅम या दरानं मिळत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव १,६०,१८८ रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात ५०४ रुपयांची वाढ झाली आहे.
11 Mar, 26 03:05 PM
Air India नं प्रवास करणं महागणार, उद्यापासून तिकिटांवर फ्युअल सरचार्ज लागणार
एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणं आता महाग होणार आहे. १२ मार्चपासून कंपनी प्रत्येक देशांतर्गत विमान तिकिटावर ३९९ रुपयांचा फ्यूल सरचार्ज म्हणजेच इंधन अधिभार लावण्यास सुरुवात करणार आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही विमान कंपन्यांच्या तिकिटांवर हा वाढीव दर लागू असेल.
11 Mar, 26 01:51 PM
विधान भवनाबाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या परिसरात एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला रोखले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
11 Mar, 26 01:10 PM
: सिंधुदुर्गात गॅस टंचाईचा फटका; पर्यटक असतानाही हॉटेल व्यवसाय अडचणीत
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या मोठ्या संख्येने पर्यटकांनी येथे हॉटेल बुकिंग केलेले असतानाच गॅस पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले आहे.
11 Mar, 26 12:26 PM
केंद्र सरकारच्या धोरणावर प्रकाश आंबेडकर यांची टीका
केंद्र सरकार अनेक वर्षांपासून ‘आत्मनिर्भरते’चे जुमले देत आहे. मात्र आवश्यक गॅस साठा आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य संघर्ष होऊ शकतो आणि त्याचा पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो, हे माहित असूनही सरकारने कोणतीही ठोस तयारी केली नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
11 Mar, 26 11:45 AM
हे केंद्र सरकारचं अपयश, तृणमूल काँग्रेस खासदाराची टीका
देशात एलपीजीची किंमत वाढली आहे. विमान वाहतुकीचे दर वाढलेत हे केंद्र सरकारचे अपयश आहे. सर्व सामान्यांना त्रास होऊ नये यासाठी केंद्राने आधीच खबरदारी घ्यायला हवी होती. लोकांना यातून दिलासा देण्यासाठी सब्सिडीची गरज आहे असं तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटलं.
11 Mar, 26 11:43 AM
गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत; लाकडाच्या भट्ट्यांवर सुरू व्यवसाय
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचे परिणाम आता गॅस पुरवठ्यावर दिसू लागले आहेत. गेल्या चार दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने मोठा फटका बसला आहे. परिणामी काही ठिकाणी हॉटेल चालकांना लाकडाच्या भट्ट्या पेटवून व्यवसाय सुरू ठेवावा लागत आहे.
11 Mar, 26 11:19 AM
चोपडा शहरात गॅस हंडी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी; स्टॉक मुबलक असतानाही तांत्रिक अडचणी
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशावरही दिसू लागला आहे. काही भागांमध्ये गॅस हंडीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे येत्या काळात गॅस टंचाई निर्माण होईल, अशी अफवा नागरिकांमध्ये पसरल्याने चोपडा शहरातील गॅस एजन्सीसमोर गॅस हंडी घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत.
11 Mar, 26 11:19 AM
गॅस तुटवड्याची भीती, लोकांच्या लांबच लांब रांगा
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारीचे उपाययोजना केल्या जात आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी केला जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती असून, देशभरात ठिकठिकाणी लोकांच्या सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत.
11 Mar, 26 10:35 AM
मेटाने इस्रायलमधील ऑफिस केलं बंद
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे मेटा कंपनीने तेल अवीवमधील कार्यालय बंद केले आहे. तेल अवीववर हवाई हल्ले होत असल्याने काही काळासाठी हे कार्यालय बंद ठेवले जाणार आहे. मेटाने अधिकारी कर्मचाऱ्यांना याबद्दल कळवले असून, ज्यांना बॉम्ब शेल्टरमध्ये प्रवेश मिळणार नाही, त्यांच्या राहण्याची पाच रात्रींसाठी व्यवस्था ऑफिसकडून केली जाणार आहे.
11 Mar, 26 10:18 AM
नाना पटोले यांनी उरण येथील जेएनपीए बंदराला भेट
इराण-इजराइल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील आयात-निर्यात व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी थेट उरण येथील जेएनपीए बंदराला भेट देत कंटेनरमध्ये अडकून पडलेल्या मालाची पाहणी केली.
11 Mar, 26 10:17 AM
ठाण्यात टेस्ट ड्राइव्ह दरम्यान भीषण अपघात
ठाण्यात टेस्ट ड्राइव्ह दरम्यान भीषण अपघाताची घटना घडली आहे. महिला चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिघेजण जखमी झाले आहेत.
11 Mar, 26 10:17 AM
अंबरनाथमध्ये सव्वाचार कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक
अंबरनाथ येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अंबरनाथ परिसरात चरस विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत मोठ्या प्रमाणात चरस जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे सव्वाचार कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
11 Mar, 26 10:15 AM
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना कॉल
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल लष्करी संघर्ष पेटलेला असतानाच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना कॉल केला. एस. जयशंकर म्हणाले की, "आज सायंकाळी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासोबत सध्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दल नवीन घडामोडींविषयी सविस्तर चर्चा केली. एकमेकांच्या संपर्कात राहूयात, यावर दोन्ही देश सहमत झाले."