सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:33 IST2026-04-09T18:32:54+5:302026-04-09T18:33:04+5:30
LPG Ships of India: एका दिवसांत ५८ लाख सिलेंडरचे वितरण, सरकारची माहिती.

सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
Iran War Hormuz Update LPG Ship: देशातील ऊर्जा पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अशातच, LPG सह इंधन पुरवठ्याबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशातील पुरवठा व्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम झालेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, एका दिवसात देशभरात ५८ लाखांहून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्यात आले. याशिवाय, कमर्शियल एलपीजीची उपलब्धता सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढली असून, सामान्यांना दिलासा मिळत आहे. एका दिवसात सुमारे ६७०० टन कमर्शियल एलपीजीची विक्री झाली, जी जवळपास ३.५ लाख सिलेंडर इतकी आहे. तसेच, ५ किलोचे सुमारे १.०६ लाख सिलेंडर विकले गेले आहेत.
🚢 'ग्रीन आशा' जहाज जवाहरलाल नेहरू बंदरात सुखरूप दाखल; भारतीय जहाजे आणि खलाशी सुरक्षित! 🇮🇳
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 9, 2026
सागरी सुरक्षा आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर जहाजबांधणी मंत्रालयाने भारतीय सागरी व्यापाराबाबत अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक माहिती दिली आहे.
♦️'ग्रीन आशा' (Green Asha) हे LPG वाहक… pic.twitter.com/z0mnyumixO
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खत उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक वायूचा पुरवठादेखील ९५ टक्क्यांपर्यंत सुनिश्चित करण्यात आला आहे. तसेच, देशातील एलपीजीचे दैनिक उत्पादन ४८,००० टनांपर्यंत पोहोचले आहे.
होर्मुझ पार करून LPG टँकर भारतात दाखल
दरम्यान, आज ग्रीन आशा हे एलपीजी वाहक जहाज Strait of Hormuz पार करून जवाहरलाल नेहरू पोर्ट येथे सुरक्षित दाखल झाले आहे. गेल्या २४ तासांत भारतीय जहाजे किंवा खलाशांबाबत कोणतीही अनुचित घटनाही घडलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, आतापर्यंत सुमारे १,८०० हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले असून, देशातील सर्व बंदरांवरील कामकाज सुरळीत सुरू आहे.
याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे. सध्या इराणमध्ये सुमारे ७,५०० भारतीय नागरिक असून, त्यांनी सुरक्षित मार्गाने आर्मेनिया किंवा अझरबैजानमार्गे भारतात परतावे, असे आवाहन करण्यात आले आहे.