इराण युद्धामुळे एलपीजी-तेलाचे संकट! PM मोदींचे देशवासीयांना आवाहन, तर विरोधकांवर टीकेचे बाण; काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:12 IST2026-03-28T15:09:53+5:302026-03-28T15:12:31+5:30
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांना गॅस आणि तेल टंचाईच्या झळा बसत आहेत. भारतातही एलपीजी आणि तेल टंचाई जाणवत असल्याची परिस्थिती जमिनीवर दिसत आहे. अशात पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील जनतेला एक आवाहन केले.

इराण युद्धामुळे एलपीजी-तेलाचे संकट! PM मोदींचे देशवासीयांना आवाहन, तर विरोधकांवर टीकेचे बाण; काय बोलले?
"तुम्ही सगळे बघत आहात की, जग किती चिंताग्रस्त झाले आहे. मागील एका महिन्यापासून पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक देशांमध्ये खाण्या-पिण्याचे गोष्टी, पेट्रोल-डिझेल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे टंचाई निर्माण झाली आहे", असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना या संकटाचा एकजुटीने सामना करण्याचे आवाहन केले.
नोएडातील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील युद्ध आणि निर्माण झालेले गॅस-तेल संकट यावरही भाष्य केले.
जिथे युद्ध सुरू तिथूनच भारत सर्वाधिक तेल गॅस आयात करतो -मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रत्येक देश या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतही देशवासीयांच्या ताकदीच्या बळावर आपली पूर्ण शक्ती या संकटाचा सामना करण्यासाठी लावत आहे. ज्या क्षेत्रामध्ये हे युद्ध सुरू आहे, तिथून भारत मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात करतो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आणि शेतकऱ्यांवर याचा भार पडू नये, यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करत आहे."
माझी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली
"आता जे युद्ध सुरू आहे, यामुळे निर्माण झालेल्या संकटाला कसे सामोरे जायचे आहे, याबद्दल मी संसदेमध्येही सविस्तरपणे सांगितले आहे. माझी काल देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. सकारात्मक चर्चा झाली. आज सगळ्या जनतेला पुन्हा सांगेन, मी भारतीयांना पुन्हा सांगू इच्छितो की, आपल्याला शांत मनाने, धैर्याने, एकजुटीने, मिळून मिसळून या संकटाचा सामना करायचा आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"हे संकट संपूर्ण जगासमोर अडचणी उभं करणारं संकट आहे. आपल्याला आपल्या देशाचा सर्वात जास्त चिंता करायची आहे. हीच आपल्या भारतीयांची सर्वात मोठी शक्ती आहे. मी उत्तर प्रदेशातील, देशातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की, या संकटाच्या काळात अशा गोष्टी बोलणे टाळा, ज्या देशाचे नुकसान करतील", असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
"जे भारतीयांच्या फायद्याचे आहे आणि भारताच्या हिताचे आहे, तेच भारत सरकारचे धोरण आणि मुत्सद्देगिरी आहे. राजकारणासाठी चुकीची विधाने करणारे राजकीय चर्चेत काही नंबर मिळवतील, पण देशाचे नुकसान करणाऱ्या कृतींसाठी देशातील जनता कधीही माफ करत नाही. कोरोना संकटाच्या काळातही काही लोकांनी अफवा पसरवल्या. लसीबद्दल खोटं बोललं गेलं. जेणेकरून सरकारला काम करणं कठीण व्हावं. देशाचे नुकसान व्हावं. त्याचे परिणाम काय झाले? जनतेने निवडणुकीच्या काळात अशा राजकारणाला नाकारलं. धुडकावून लावलं", अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली.