LPG Crisis: 47,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन जग वसंत भारतात, आणखी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:13 IST2026-03-28T14:11:49+5:302026-03-28T14:13:26+5:30
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाली. व्यावसायिक गॅसमध्ये कपात केली गेली. मात्र, आता एलपीजी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, आणखी एक जहाज भारतात दाखल झाले आहे.

LPG Crisis: 47,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन जग वसंत भारतात, आणखी दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे भारताच्या गॅस आणि तेल आयातीवर परिणाम झाला आहे. अशातच भारतासाठी चांगली बातमी आली आहे. ४७००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन जग वसंत जहाज भारतात दाखल झाले आहे. त्याचबरोबर एलपीजी आणि पेट्रोलियम पदार्थ घेऊन भारताच्या दिशेने दोन जहाजे रवाना झाली आहेत. ही दोन्ही जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी पार करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
जग वसंत हे गॅस जहाज एलपीजी गॅस घेऊन शनिवारी भारतात पोहोचले. हे जहाज गुजरातमधील जामनगरमध्ये असलेल्या कांडला वादीनगर टर्मिनलवर पोहोचले आहे. हे जहाज ४७००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन आले आहे. या जहाजातून एलपीजी दुसऱ्या जहाजांमध्ये भरला असून, तिथून देशाच्या इतर भागात पाठवला जाणार आहे.
#WATCH | MT Jag Vasant arrives at DPA Kandla's Vadinar Terminal (Jamnagar, Gujarat) with 47,000 MT of LPG, set for Ship-to-Ship (STS) transfer at anchorage. Maintaining resilience & reliability for un-interrupted energy supply chain.
— ANI (@ANI) March 28, 2026
(Source: Deendayal Port Authority Kandla) pic.twitter.com/aelhMDbxyp
दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये
इराण-इस्रायलमध्ये हल्ले सुरू असतानाच भारताची दोन जहाजे रवाना झाली आहेत. हे दोन जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत पार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी नौदल अलर्ट मोडवर ठेवले आहे. फारस खाडी आणि आजूबाजूच्या परिसरात युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. या युद्धनौका जहाजाच्या सुरक्षिततेसाठी तैनात केल्या गेल्या आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जहाज वाहतूक आणि जल मार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की, मागील २४ तासांत आखाती क्षेत्रातून भारतीय जहाज किंवा नावाड्यांसोबत कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही.
फारस खाडीमध्ये सध्या भारतीय ध्वज असलेली २० जहाजे सध्या आहेत. त्या जहाजांवर ५४० भारतीय आहेत. हे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.