Ayushman Bharat योजनेची मर्यादा वाढणार; 5 ऐवजी 10 लाख रुपयां विमा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 21:14 IST2024-07-07T21:13:12+5:302024-07-07T21:14:32+5:30
पुढील तीन वर्षांत लाभार्थी संख्या दुप्पट करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे.

Ayushman Bharat योजनेची मर्यादा वाढणार; 5 ऐवजी 10 लाख रुपयां विमा मिळणार
Ayushman Bharat Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDA सरकार या महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (PMJAY) आणि 'आयुष्मान भारत योजने'बाबत सरकार काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारआयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विम्याची रक्कम दुप्पट करणार आहे.
प्रस्तावाला अंतिम रुप देण्याची तयारी
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एनडीए सरकार लाभार्थ्यांची संख्या आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची विमा रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे. योजनेतील लाभार्थ्यांची कव्हरेज लिमिट प्रति वर्ष 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करण्याची सरकारची तयारी आहे. तसेच, योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत लाभार्थी संख्या दुप्पट करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे. सरकारने येत्या तीन वर्षांत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याची घोषणा केली, तर देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला आरोग्य कवच मिळू शकेल.
सरकारी तिजोरीवर बोजा वाढणार
केंद्र सरकार 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान, कव्हरेज मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने तयार केलेल्या अंदाजानुसार सरकारी तिजोरीवर दरवर्षी 12,076 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. विशेष म्हणजे, 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही आता या योजनेत समाविष्ट करुन घेतले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जून रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात संबोधित करताना ही माहिती दिली होती.