कुवेतहून केरळला आलेल्या विमानातून २० जणांचे मृतदेह आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:42 IST2026-04-01T09:40:49+5:302026-04-01T09:42:14+5:30
Kuwait Indian Bodies: कुवेतमधील विविध अपघातात मृत पावलेल्या २० भारतीयांचे मृतदेह विशेष विमानाने कोची येथे आणण्यात आले. पश्चिम आशियातील युद्धजन्य तणावामुळे या प्रक्रियेला उशीर झाला होता.

कुवेतहून केरळला आलेल्या विमानातून २० जणांचे मृतदेह आले...
कुवेतमध्ये विविध घटनांमध्ये प्राण गमावलेल्या २० भारतीय नागरिकांचे पार्थिव अखेर मंगळवारी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. पश्चिम आशियातील तणावपूर्ण वातावरण आणि विमान सेवांमध्ये झालेल्या व्यत्ययामुळे हे मृतदेह भारतात आणण्यास बराच विलंब झाला होता.
कुवेत एअरवेजच्या 'KU5632' या विशेष विमानाने हे पार्थिव कोलंबोमार्गे कोची येथे आणले. विशेष म्हणजे या विमानात एकही प्रवासी नव्हता, हे विमान केवळ मृतदेह आणण्यासाठीच चालवण्यात आले होते.
विलंबाचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या मृतदेहांचा तेथे सुरू असलेल्या युद्धाशी थेट संबंध नाही. मात्र, इराण-इस्रायल किंवा इतर प्रादेशिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. कागदपत्रांची पूर्तता आणि विमानांची अनुपलब्धता यामुळे या भारतीयांचे पार्थिव कुवेतमध्येच अडकून पडले होते.
परिजनांचा आक्रोश; रुग्णवाहिकांची सोय
विमानतळावर पार्थिव पोहोचल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तातडीने पुढील सोपस्कार पूर्ण केले. मृत व्यक्तींमध्ये बहुतांश लोक केरळमधील कोझिकोड, अलप्पुझा आणि कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी होते. तसेच काही मृतदेह रस्तेमार्गे तामिळनाडूला पाठवण्यासाठी रुग्णवाहिकांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या प्रियजनांचे पार्थिव मिळाल्याने विमानतळ परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण होते.