संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:22 IST2022-03-23T14:20:58+5:302022-03-23T14:22:42+5:30
रुग्णालयाने 5 जिवंत लोकांना मृत दाखवलं आणि कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठी देखील अर्ज केला आहे.

संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,778 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहेत. रुग्णालयाने 5 जिवंत लोकांना मृत दाखवलं आणि कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठी देखील अर्ज केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील तीन रुग्णालयांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
रुग्णालयांनी पाच जिवंत रुग्णांना चक्क मृत घोषित केलं. एवढंच नाही तर कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठीदेखील अर्ज केला आहे. सरकारच्या वतीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. चीफ मेडिकल ऑफिसरने कोरोना दरम्यान जीव गमवलेल्या लोकांची एक यादी प्रशासनाला पाठवली आहे. पण ही यादी जेव्हा अधिकाऱ्यांनी पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण यात मृत दाखवलेले लोक जिवंत होते.
सीएमओने तपास करून रिपोर्ट तयार केल्यावर याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. जीएसवीएम मेडिकल कॉलेजमध्ये जास्त घोटाळा झाला आहे. येथील तीन लोकांना मृत दाखण्यात आलं आहे. तर नारायण मेडिकल कॉलेज आणि एमकेसीएच रुग्णालयाने प्रत्येकी एक जिवंत रुग्णाला मृत घोषित केलं आहे. रुग्णालयाकडे याचं उत्तर मागण्यात आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सीएमओंनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल कॉलेजच्या वतीने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये ज्यावेळी या लोकांचा रिपोर्ट पोर्टलवर अपलोड करण्यात आला. त्यावेळी डिस्चार्जच्या ऐवजी मृत्यू लिहिल्याचं म्हटलं आहे. इतर दोन रुग्णालयांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जर या रुग्णालयांनी उत्तर दिलं नाही. तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.