CJI Uday Umesh Lalit Oath: आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 11:22 IST2022-08-27T11:21:20+5:302022-08-27T11:22:04+5:30
Justice Uday Umesh Lalit takes oath: वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत.

CJI Uday Umesh Lalit Oath: आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपूत्र उदय लळीत यांची नियुक्ती झाली आहे. लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळीत यांना शपथ दिली.
महाराष्ट्रासाठी आजचा आणखी एक सोनेरी दिवस उजाडला आहे. लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे सरन्यायाधीश आहेत. रमणा यांच्यापूर्वी नागपूरचे शरद बोबडे हे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे ते ४९ वे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा कार्यकाळ अवघा ७४ दिवसांचा असेल. १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत.
कोकणचे सुपुत्र !
न्या. उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपुत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. ९ नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
#WATCH | President Droupadi Murmu administers the oath of Office of the Chief Justice of India to Justice Uday Umesh Lalit at Rashtrapati Bhavan pic.twitter.com/HqayMJDwBB
— ANI (@ANI) August 27, 2022
महाराष्ट्राचेच आव्हान...
लळीत यांच्यासमोर महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला सत्ताकारणाचा भूकंप एक मोठे आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे अपात्र याचिका, शिवसेना कोणाची याची याचिका अशा चार-पाच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या होणार आहेत. रमणा यांच्या कार्यकाळात या याचिका दाखल झालेल्या असल्या तरी त्यावर रमणांनी निर्णय देणे टाळले होते. हा ऑगस्ट महिना तर या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यातच गेला आहे. यामुळे लळीत यांना लवकरात लवकर या याचिका निकाली काढाव्या लागणार आहेत. लळीत महाराष्ट्राचेच असल्याने याचाही दबाव त्यांच्यावर असणार आहे.