"मोहम्मद अली जिना हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी होते"; JDU नेत्याच्या विधानाने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 02:37 PM2021-11-13T14:37:33+5:302021-11-13T14:45:55+5:30
JDU Leader Khalid Anwar : जदयुचे आमदार खालिद अन्वर यांनी जिनांबाबत विधान केलं आहे.
नवी दिल्ली - समाजवाजी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर (Omprakash Rajbhar) यांनी जिनांबाबत केलेल्या विधानामुळे तो वाद आणखी वाढला. जर मोहम्मद अली जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. यानंतर आता जदयुचे आमदार खालिद अन्वर (JDU Leader Khalid Anwar) यांनी देखील जिनांबाबत विधान केलं आहे. "मोहम्मद अली जिना हे महान स्वातंत्र्य सेनानी होते" असं म्हटलं आहे.
खालिद अन्वर यांनी "मोहम्मद अली जिना हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना पाकिस्तानबद्दल आदर होता. ते एक मोठे नेते होते यामध्ये अजिबात शंका नाही. देशाच्या फाळणीला ते जबाबदार होतेच, पण त्यांच्याइतकेच भारताचे पहिले पंतप्रधान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसदेखील फाळणीला जबाबदार होते" असं म्हटलं आहे. तसेच "काँग्रेसच्या फूट पाडा आणि राज्य करा या राजकारणामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेस करत असलेल्या राजकारणाचा हा खरा चेहरा आहे. आणि त्याच प्रकारचं राजकारण काँग्रेस खेळत आली आहे" असं देखील अन्वर यांनी म्हटलं आहे.
MA Jinnah was a great freedom fighter of united India. Unfortunate that his role in partition of India was big. Divide&rule politics of Congress led to the partition of India. We respect Mahatma Gandhi.We also don't want to disrespect any other freedom fighter:Khalid Anwar, JD(U) pic.twitter.com/71aY2GfG4d
— ANI (@ANI) November 13, 2021
"देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार"
एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी "देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे. ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. त्यामध्ये त्यांनी "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भारतीय जनता पार्टी (BJP) आणि समाजवादी पार्टी यांचे जे लोक इतिहास वाचत नाही, त्यांना आव्हान देतो. फाळणी मुस्लिमांमुळे किंवा जिना यांच्यामुळे झाली नाही. त्यावेळी फक्त तेच मुस्लिम मतदान करू शकत होते जे नवाब किंवा पदवीधारकांसारखे प्रभावशाली होते. काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच फाळणीसाठी जबाबदार होते" असं म्हटलं आहे. ओपी राजभर यांनी बुधवारी वाराणसीमध्ये मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे विधान केल्यानंतर ओवेसी यांनी आता हे विधान केलं आहे.
"उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करणं माहीत नाही पण हत्या करणं माहितीय"
ओवेसी यांनी कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. "कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की त्यांच्या मुलाने हुडीच्या तारने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली. परंतु कासगंज पोलिसांनीच त्या तरुणाची हत्या केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करणे माहीत नाही पण हत्या करणं माहीत आहे" असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.