Jaipur Blast Story: म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी... किंवा काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असंच काही घडलं आहे जयपूर गॅस टँकर स्फोटात! जयपूर-अजमेर महामार्गावरून एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या एका टँकरला ट्रकने धडक दिली. त्यानंतर गॅसची गळती होऊन प्रचंड मोठा स्फोट झाला. यात आजूबाजूची वाहने जळून खाक झाली, तर १४ जणांचा मृत्यू झाला. पण, ज्या गॅस टँकरचा स्फोट झाला, त्याचा चालक बचावला असून, त्याला साधे खरचटलेही नाही!
20 डिसेंबर २०२४ रोजी जयपूरमधील भांकररोटा परिसरात एलपीजी गॅस टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला असून २३ पेक्षा अधिक लोक होरपळून जखमी झाले आहेत. मोजकेच लोक यातून वाचले असून, यात गॅस टँकरच्या चालकाचाही समावेश आहे.
गॅस टँकरचा चालकाने कसा वाचवला स्वतःचा जीव?
स्फोट झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी गॅस टँकरच्या मालकाशी संपर्क केला. त्यांनी स्फोट झाल्याची माहिती मालकाला दिली आणि टँकरच्या चालकाची माहिती विचारली. त्यानंतर चालक जिवंत असल्याचे पोलिसांना कळले.
जयवीर असे टँकर चालकाचे नाव असून, तो मथुराचा रहिवासी आहे. मालकाकडून त्याचा पत्ता आणि माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला. त्याला चौकशीसाठी जयपूरला बोलावले.
पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने टँकरला धडक दिल्यानंतर चालक जयवीरने खाली उडी मारली आणि तो जयपूरच्या दिशेने धावत सुटला. टँकरमधून गॅस गळती होऊन स्फोट होईपर्यंत तो बराच दूर गेला होता. त्यामुळे तो या अपघातातून थोडक्यात बचावला.