भारतानं इतिहास घडवला! १२ हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाची निर्मिती; पहिल्याच फटक्यात ११८ डबे खेचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 19:40 IST2020-05-20T19:39:13+5:302020-05-20T19:40:47+5:30
भारतीय रेल्वे दरवर्षी १२० शक्तिशाली इंजिनांची निर्मिती करणार

भारतानं इतिहास घडवला! १२ हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाची निर्मिती; पहिल्याच फटक्यात ११८ डबे खेचले
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं देशातल्या सर्वात शक्तिशाली इंजिनाची निर्मिती केली आहे. बिहारच्या मधेपुरा रेल्वे कारखान्यात शक्तिशाली एसी इलेक्ट्रिक इंजिन तयार करण्यात आलं आहे. तब्बल १२ हजार हॉर्सपॉवरची क्षमता असणारं अतिशय वेगानं धावू शकतं. पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन भागात इंजिनाची पहिली चाचणी घेण्यात आली.
पहिल्या चाचणीत इंजिनानं मालगाडीचे ११८ डबे यशस्वीपणे खेचले. चाचणी दरम्यान इंजिनानं पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन ते झारखंडच्या बरवाडीह दरम्यानचं २७६ किलोमीटर अंतर कापलं. देशातल्या सर्वाधिक क्षमतेची इंजिनाची निर्मिती आणि त्याची यशस्वी चाचणी आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना चाचणीनंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हे इंजिन ताशी १२० किलोमीटर वेगानं धावू शकतं.
मधुपेरामधल्या रेल्वे कारखान्यात देशातल्या सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली इंजिनाची निर्मिती करण्यात आली. यासाठी १९ हजार कोटी रुपयांचा खर्च आला. ऑक्टोबर २०१७ पासून या इंजिनाच्या निर्मितीवर काम सुरू होतं. शक्तिशाली इंजिनाच्या यशस्वी प्रयोगामुळे भारताच्या नावापुढे ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. जास्त हॉर्सपॉवरच्या इंजिनाची देशातच निर्मिती करणाऱ्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. याआधी अशी कामगिरी केवळ पाच देशांना जमली आहे. जास्त हॉर्सपॉवर असलेल्या इंजिनाची ब्रॉड गेजवर चाचणी घेणारा भारत पहिला देश ठरला आहे.
अशा प्रकारच्या शक्तिशाली इंजिनांची निर्मिती करण्यासाठी बिहारच्या मधेपुरामध्ये एक विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी १२० इंजिनांची निर्मिती या प्रकल्पात केली जाईल. जवळपास अडीचशे एकरवर हा कारखाना उभारण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणार
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त
'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा