युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय शेतकरी सुरक्षित: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:17 IST2026-03-24T12:17:04+5:302026-03-24T12:17:04+5:30
सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टनांहून अधिक कोळसा उत्पादन करून भारताने विक्रम केला आहे.

युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय शेतकरी सुरक्षित: पंतप्रधान मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धाचा शेतीवर परिणाम होऊ नये, खरीप पेरणी योग्य प्रकारे पार पडावी यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. जागतिक संकटांचा, युद्धाचा शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना फटका बसू नये यासाठी सरकार दक्ष आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.
युद्धाबाबत केलेल्या निवेदनात मोदी म्हणाले की, देशात उन्हाळा सुरू झाल्याने विजेची मागणी वाढली असली तरी सर्व वीज प्रकल्पांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध आहे. सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टनांहून अधिक कोळसा उत्पादन करून भारताने विक्रम केला आहे.
यासाठी भारत चिंताग्रस्त
पंतप्रधान म्हणाले की, आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय रोजगार, व्यवसायासाठी राहात आहेत. व्यापारी जहाजांमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. युद्ध सुरू असलेला प्रदेश हा भारताच्या जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग. कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू आणि खतांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा मोठा पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात येतो. इंधनाचा पुरवठा फारसा विस्कळीत होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
‘अंतर्गत सुरक्षेवरही सरकारचे बारीक लक्ष’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम आशियातील संकटाच्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो. सध्या परिस्थितीचा काही घटक गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत.