'आम्हाला तुमचं मीठही नको आणि ...'; भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:13 IST2025-05-05T15:49:49+5:302025-05-05T16:13:28+5:30

India Pakistan Tension : भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे.

India gives another big blow to Pakistan Rock salt order cancelled these items also banned | 'आम्हाला तुमचं मीठही नको आणि ...'; भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का

'आम्हाला तुमचं मीठही नको आणि ...'; भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. यातच आता भारतानेपाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी सैंधव मिठाच्या ऑर्डर्स रद्द केल्या असून, नव्या ऑर्डर देणे देखील बंद केले आहे.

चेंबर ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन मंत्री अशोक लालवाणी यांनी माहिती देताना म्हटले की, "पाकिस्तानातून सैंधव मीठ, खजूर, काळे मनुके आणि सब्जा आयात करण्यात येत होते. तर, अंजीर आणि मनुका अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचत होते."

भारतात मोठा व्यापार 
या वस्तूंचा भारतात मोठा व्यापार आहे. दर महिन्याला २५०-३०० टन सैंधव मीठ, ५५०-६०० टन खजूर, १५ टन पिस्ता, काळे मनुके आणि सब्जाचा व्यापार होतो. मात्र, पाकिस्तानातून आयात बंद केल्याने आता घाऊक विक्रेत्यांनी सैंधव मीठाच्या मोठ्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत. तर, विक्रेत्यांनी नव्या ऑर्डर स्वीकारणे देखील बंद केले आहे. 

आग्रा किराणा, रंग आणि केमिकल कमिटीचे सदस्य पवनदीप कपूर यांनी म्हटले की, "आग्र्यात सुक्यामेव्याचे ३० घाऊक व्यापारी आहेत. आमच्या इथे मनुका, पिस्ता, अंजीर हे अफगाणिस्तानातून आयात होत असले, तरी ते पाकिस्तानमार्गे येतात.आग्र्यात २५-३० टन अंजीर, ४०-५० टन मनुक्यांचा व्यापार आहे. आता दुसऱ्या देशाच्या मार्गे यांची आयात होईल. मात्र, यामुळे खर्च वाढणार असून, याचा प्रभाव किंमतींवर पडणार आहे. मात्र, देशाच्या हितासाठी संपूर्ण व्यापारी वर्ग सरकारच्या या निर्णयात साथ देणार आहे."

सुती कपड्यांच्या किमतींवर पडणार प्रभाव
आग्रा व्यापार मंडळाच्या अध्यक्ष टीएन अग्रवाल म्हणाले की, "पाकिस्तानमधून आयात थांबावल्यामुळे सुती कपड्यांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. सुती कपड्यांची मागणी सध्या चांगलीच वाढली आहे. या कापडापासून शर्ट, धोतर, अंतरवस्त्रे बनवले जातात. अशा परिस्थितीत सुती कपड्यांच्या किंमती देखील वाढू शकतात. यामुळे भारतीयांना थोडा त्रास होईल. मात्र, पाकिस्तानला यामुळे मोठे नुकसान होणार आहे."

Web Title: India gives another big blow to Pakistan Rock salt order cancelled these items also banned