India China FaceOff: ...असा निर्दयीपणा म्हणजे जिनेव्हा कराराचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:07 IST2020-06-23T03:47:00+5:302020-06-23T07:07:37+5:30
एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

India China FaceOff: ...असा निर्दयीपणा म्हणजे जिनेव्हा कराराचे उल्लंघन
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : चीनच्या सैनिकांनी १५ जून रोजी कर्नल बी. संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला आणि त्यासाठी मध्ययुगीन साधने वापरली. यातून चीनने सरळसरळ जिनेव्हा कराराचे उल्लंघन केले आहे. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून २ किमीच्या आत गोळीबार आणि स्फोट करता येणार नाही असे ठरलेले आहे. एच. डी. देवेगौडा पंतप्रधान असताना १९९६ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. चीनच्या सैनिकांनी खिळे लावलेले रॉड, वजनदार दगडं, तार यांचा वापर करत भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या साधनांचा उल्लेख १९९६ च्या करारात केला गेलेला नसेल. पण, जिनिव्हा करारात याचा वापर करण्यास प्रतिबंध आहेत.
या मध्ययुगीन साधनांबाबत भारत सरकारने अधिकृत वक्तव्य केलेले नाही. पण, सूत्रांचे म्हणणे आहे की, हा निर्दयीपणा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. याची माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला द्यायला हवी.
>करारात काय?
भारत आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा हंगमी सदस्य बनलेला आहे आणि काही लोकांचे म्हणणे आहे की, भारताला चिनी क्रूरतेबाबत जागतिक मत तयार करावे लागेल. 1962 ला चीनच्या आक्रमणानंतर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मूळ जिनेव्हा करारात अतिरिक्त प्रोटोकॉल जोडले. 1977 च्या जिनेव्हा करारात कलम ३५, भाग ३ मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, युद्धात साधनांची निवड करण्याबाबत दोन्ही बाजूंचा अधिकार अमर्यादित नाही. दुसºयाला पीडा होईल असे शस्त्र, साधने वापरण्यास प्रतिबंध आहे.