IND vs PAK: "BCCIला पैशापुढे काहीच दिसत नाही, देशाची अब्रू..."; प्रियंका चतुर्वेदी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:45 IST2026-02-10T14:43:50+5:302026-02-10T14:45:16+5:30
Priyanka Chaturvedi on Ind vs Pak cricket: भारत या विश्वचषकात पाकिस्तानशी १५ फेब्रुवारीला खेळणार आहे.

IND vs PAK: "BCCIला पैशापुढे काहीच दिसत नाही, देशाची अब्रू..."; प्रियंका चतुर्वेदी संतप्त
Priyanka Chaturvedi on Ind vs Pak cricket: सध्या सुरू असलेल्या ICC T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियोजित असलेल्या सामन्याबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली. रविवारी हा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ आता सज्ज झाले आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानने आयसीसीशी चर्चा केल्यावर माघार घेतली. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर बांगलादेशला टी२० विश्वचषकातून बाहेर हाकलण्यात आले. पाकिस्ताननेही बांगलादेशची बाजू घेत सामना खेळणार नाही असे सांगितले होते. पण अखेर ते आता सामना खेळण्यास तयार झाले आहेत. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, उद्धवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर रोखठोक भाष्य केले आहे.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "हा काय पोरखेळ आहे? भारत वाट बघत बसलेला की पाकिस्तान काय निर्णय घेतो. जर भारत सरकारकडे थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनीच म्हटले पाहिजे की आम्हाला हा सामना खेळायचा नाही. कारण ज्याप्रकारे पाकिस्तानने सामना खेळणार असल्याची घोषणा केली आणि यू टर्न घेतला. त्यात काहीच नवल नाही. कारण त्यांचे मोठे आर्थिक नुकसान वाचणार आहे. जर दंड लावण्यात आला तर तो भरण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. तसेच आंतरराष्ट्रीय निधी अशा गोष्टींसाठी वापरला जाऊ शकत नाही असे सांगण्यात आले असेल. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा."
"मूळ मुद्दा हा आहे की आपला देश जर जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल आणि बीसीसीआय क्रिकेट मधील सर्वात श्रीमंत बोर्ड असेल, तर आपणच म्हणायला हवे होते की आता आम्हाला सामना खेळायचा नाही. पण आपले लोक असे म्हणताना दिसत नाहीत. कारण बीसीसीआयला पैसे आणि नफा यापुढे इतर काहीच दिसत नाही. देशाची अब्रू आणि भावना एक बाजूला आणि नफा, पैसा, ब्रॉडकास्टिंग हक्कांमधून पैसे मिळवणे दुसऱ्या बाजूला हेच त्यांचे उद्देश आहे. भारतालाच पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळत राहायचे आहे. भारतीय मीडिया जरी याबाबत पाकिस्तानचा यू टर्न असा उल्लेख करत असेल, तरीही माझ्यामध्ये हा सामना म्हणजे एका अर्थाने भारत सरकार आणि बीसीसीआय यांचा पराभवच आहे," अशी बोचरी टीका त्यांनी केली.