अनर्थ टळला! १६१ प्रवाशांचा जीव मुठीत; किती जोखमीचे होते Indigo विमानाचं आपत्कालीन लँडिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:04 IST2026-03-28T16:03:41+5:302026-03-28T16:04:59+5:30
तांत्रिक बिघाड झाल्यास विमानाचे वजन आणि संतुलन राखणे आव्हानात्मक बनते, लँडिंगच्या वेळी टायर आणि धावपट्टी यांच्यातील आघातामुळे निर्माण होणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागू शकते

अनर्थ टळला! १६१ प्रवाशांचा जीव मुठीत; किती जोखमीचे होते Indigo विमानाचं आपत्कालीन लँडिंग?
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी मोठा गोंधळ माजला. याठिकाणी विशाखापट्टनमहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना मिळाली. या विमानाचं इंजिन फेल झाल्याचं लक्षात घेता एअरपोर्टवर तातडीने आणीबाणी घोषित केली. सकाळी ११ च्या सुमारास या विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आले, त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
आकाशातून धोक्याचा अलर्ट
सकाळी १०.५० वाजता बोइंग ७३७-८०० विमान दिल्लीच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत होते तेव्हा त्याच्या इंजिनात बिघाड झाल्याचे संकेत मिळाले. इंजिन फेल झाल्यानंतर विमानाचे संतुलन बिघडू शकते आणि हाइड्रोलिक सिस्टमवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. या विमानातील पायलटने प्रसंगावधान राखत तात्काळ दिल्ली एटीसीला संपर्क केला. १०.५३ वाजता दिल्ली एअरपोर्टवर इमरजेंसी घोषित करण्यात आली. त्यानंतर रनवे नंबर २८ हायअलर्टवर ठेवण्यात आला. लँडिंग कुठल्याही विमानासाठी कठीण प्रसंग असतो, कारण तिथे छोटी चूकही जीवघेणी ठरते. या इमरजेंसी लँडिंगमध्ये ३ प्रमुख जोखीम होत्या.
- लँडिंगवेळी विमान आधीच कमी वेगात असते. जर इंजिन पूर्णपणे बंद पडले तर विमान धावपट्टीवर आणण्यासाठी पायलटकडे प्रतिक्रिया देण्यासाठी खूप कमी वेळ असतो.
- तांत्रिक बिघाड झाल्यास विमानाचे वजन आणि संतुलन राखणे आव्हानात्मक बनते. जर विमान उतरताना संतुलन गमावून बसले तर ते धावपट्टीवरून घसरू शकते.
- इंजिन निकामी झाल्यामुळे अनेकदा घर्षण किंवा गळती होते. लँडिंगच्या वेळी टायर आणि धावपट्टी यांच्यातील आघातामुळे निर्माण होणाऱ्या ठिणग्यांमुळे आग लागू शकते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आधीच तैनात केल्या जातात.
सुरक्षित लँडिंग
या विमानाच्या लँडिंगवेळी १६१ प्रवासी श्वास रोखून होते, परंतु पायलटचं कौशल्य आणि एटीसीसोबतच्या अचूक समन्वयामुळे विमान सकाळी १०:५४ वाजता रनवे २८ वर सुरक्षितपणे उतरले. सर्व यंत्रणा सतर्क असल्याने विमान थांबताच रुग्णवाहिका आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
DGCA ने काय म्हटलं?
२८ मार्च २०२६ रोजी इंडिगोचे वेट-लीजवरील बी७३७-८०० (नोंदणी टीसीसीओएन) विमान विशाखापट्टणम ते दिल्ली (६ई-५७९) असा प्रवास करत होते. उड्डाणावेळी कोणत्याही कमांडशिवाय क्रमांक १ चे इंजिन बंद पडले. तीव्र कंपनांमुळे क्रमांक १ चे इंजिन निकामी झाले. विमानात सीएफएम-५६ इंजिन बसवलेले आहे. त्यानंतर एअरपोर्टवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि विमान सुरक्षितपणे उतरले. विमान तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले आहे असं डीजीसीएने एक निवेदन जारी करून म्हटले आहे.
दरम्यान, एका संसदीय स्थायी समितीने नुकताच अहवाल दिला आहे त्याचवेळी ही घटना घडली. भारतातील ५०% व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक दोष आहेत. विशेषतः बोईंग ७३७ ची इंजिने जागतिक स्तरावर बारकाईने तपासली जात आहेत. गेल्या महिन्यात याच मॉडेलच्या स्पाईसजेटच्या विमानाचे इंजिनही निकामी झाले होते, ज्यामुळे हा तांत्रिक दोष एक मोठी सिस्टम त्रुटी असू शकते याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.