LoC वर भारत आणि पाकिस्तानमध्ये 75 मिनिटे चालली महत्वाची बैठक; कोणत्या विषयावर चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:58 IST2025-02-21T16:57:07+5:302025-02-21T16:58:08+5:30
अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटींग झाली नव्हती.

LoC वर भारत आणि पाकिस्तानमध्ये 75 मिनिटे चालली महत्वाची बैठक; कोणत्या विषयावर चर्चा?
India-Pakistan Talk :भारत आणि पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी(21 फेब्रुवारी) दोन्ही देशांमध्ये महत्वाची बैठक झाली. यादरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) सीमेपलीकडून गोळीबार आणि आयईडी हल्ल्यांच्या अनेक घटनांनंतर तणाव कमी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. सुमारे 75 मिनिटे चाललेल्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्यावर भर दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटींग झालेली नाही. शेवटची ध्वज बैठक 2021 मध्ये झाली होती. त्यामुळेच ही बैठक खूप महत्वाची होती. बैठकीत 2021 पासून नियंत्रण रेषेवर सुरू असलेला युद्धविराम कायम ठेवणे, नियंत्रण रेषेला तणावमुक्त करणे यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करून एकमत झाले. भारताकडून पूंछ ब्रिगेडचे कमांडर आणि पाकिस्तानी लष्कराच्या दोन पाकिस्तानी ब्रिगेडचे कमांडर बैठकीत सहभागी झाले होते.
एलओसीवर घडणाऱ्या घटनांमुळे चिंता
नियंत्रण रेषेवर तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने कट रचत आहे. काही दिवसांपासून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. बुधवारी एलओसी ओलांडून राजौरीमध्ये भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. 11 फेब्रुवारी रोजी जम्मू जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या अखनूर सेक्टरमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) स्फोटात एका कॅप्टनसह दोन जवान शहीद झाले.
सैन्याची नियंत्रण रेषेवर तीक्ष्ण नजर
भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा नियंत्रण रेषेवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पाकिस्तान सतत भारताविरुद्ध कट रचतो, पण भारतदेखील पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर देतो.