महाभियोगाच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त? १९३ खासदारांचे ज्ञानेश कुमारांविरोधात पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 18:38 IST2026-03-15T18:35:38+5:302026-03-15T18:38:27+5:30
१९३ खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट महाभियोगाची नोटीस बजावली आहे.

महाभियोगाच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त? १९३ खासदारांचे ज्ञानेश कुमारांविरोधात पत्र
CEC Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम सादर केला. मात्र, या घोषणेसोबतच विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध पुकारलेल्या महाभियोग प्रकरणामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्तांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झालेली असतानाच एक कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट महाभियोगाची नोटीस बजावली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण १९३ खासदारांनी स्वाक्षरी केलेला हा प्रस्ताव संसदेत सोपवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. विरोधी पक्षांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
रविवारी पाच राज्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांना या महाभियोग प्रस्तावाबाबत विचारण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत जेव्हा ज्ञानेश कुमार यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहत त्यांनी या गंभीर विषयावर मौन बाळगणेच पसंत केले.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर केले. आसाम, केरळ, पुडुचेरी येथे ९ एप्रिल, तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल, पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. सर्व पाचही राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होतील. निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यापासून या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.