नेपाळनंतर पुढचा भूकंप कुठे होणार?; IIT कानपूरच्या रिसर्चमध्ये सांगितली 'भविष्यवाणी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:19 IST2023-11-05T10:18:26+5:302023-11-05T10:19:07+5:30

IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने भूकंपामुळे भविष्यात धोक्याची घंटा असल्याची भीती व्यक्त केली आहे.

iit kanpur analysis low magnitude earthquakes giving sound of big earthquake | नेपाळनंतर पुढचा भूकंप कुठे होणार?; IIT कानपूरच्या रिसर्चमध्ये सांगितली 'भविष्यवाणी'

नेपाळनंतर पुढचा भूकंप कुठे होणार?; IIT कानपूरच्या रिसर्चमध्ये सांगितली 'भविष्यवाणी'

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाने हाहाकार माजला आहे. या भूकंपाचे धक्के नेपाळपासून दिल्लीपर्यंत जाणवले. दिल्ली-एनसीआरसोबतच यूपी-बिहारमध्येही जमीन हादरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि लोक घराबाहेर पडले. आता IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने भूकंपामुळे भविष्यात धोक्याची घंटा असल्याची भीती व्यक्त केली आहे.

कानपूर आयआयटीचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणतात की, एकाच ठिकाणी भूकंप होणं ही चिंतेची बाब आहे. कमी तीव्रतेचे आणखी भूकंप झाल्यास मोठा भूकंप होण्याचीही शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. नेपाळप्रमाणेच उत्तराखंड झोनही सक्रिय आहे, तेथेही भूकंप होण्याची शक्यता आहे.

प्रोफेसर मलिक म्हणतात की, नेपाळमध्ये येणारे भूकंप पश्चिमेकडे सरकत आहेत आणि जर ते पश्चिमेकडे सरकले तर त्याचा परिणाम उत्तराखंडवरही होईल असा ट्रेंड दिसून आला आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तराखंडमध्येही मोठा भूकंप होणार आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी शिरल्यावर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाचा धोका वाढत असल्याचंही एका संशोधनातून समोर आले आहे.

आयआयटी कानपूरमधील एका प्रकल्पामुळे, भूकंपाची शक्यता असलेल्या ठिकाणी फॉल्ट लाइन चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. अभ्यासाचा एक भाग म्हणून, किती तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो हे शोधून काढण्यात आले.

आयआयटी कानपूर टीमने अशी जागा ओळखली आहे जिथे भविष्यात प्लेट्स बदलू शकतात. हे संशोधन शहरी विकासक आणि नियोजकांना मदत करेल. या डेटाचा वापर करून, कोणत्या ठिकाणी जड बांधकाम आणि प्रकल्प करू नयेत हे जाणून घेणे शक्य होईल, जेणेकरून भूकंप आणि मोठी हानी होण्याची शक्यता टाळता येईल.

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार माजला होता. येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. यामुळे 132 जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली दबल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूकंपामुळे सर्वाधिक मृत्यू रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये झाले आहेत. नेपाळमध्ये एवढा विध्वंस घडवून आणलेल्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात दिसून आल्याने या भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावता येतो. बिहारमधील पाटणा ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

Web Title: iit kanpur analysis low magnitude earthquakes giving sound of big earthquake