इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही देशांतील वाढत्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. एवढेच नाही तर, इस्रायलच्याइराणवरील हल्ल्याचा शेअर बाजारावरही वाईट परिणाम झाला आहे आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले आहेत. हे युद्ध आणखी वाढण्याची आणि लांबण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील देशांचे टेन्शन वाढले आहे.
इराण आणि इस्रायल युद्ध लांबल्यास पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. यामुळे अनेक वस्तूंच्या अथवा गोष्टींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया, अशा परिस्थितीत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा आणि इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? भारत या दोन्ही देशांकडून कोण कोणत्या गोष्टींची आयात करतो आणि कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढू शकता? इस्रायलकडून कोण कोणत्या वस्तू आयात करतो भारत? -भारत आणि इस्रायल यांच्यात दीर्घकाळापासून चांगले व्यापारी संबंध आहेत. आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इस्रायलला २.१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या आहेत. तर १.६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत संरक्षण क्षेत्राशी संबंधित बहुतेक वस्तू इस्रायलकडून आयात करतो. महत्वाचे म्हणजे, इस्रायल हा भारताचा ३२ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत इस्रायलकडून रडार, सर्व्हिलांन्स, लढाऊ ड्रोन, क्षेपणास्त्रे यांसह लष्करी हार्डवेअर आयात करतो. याशिवाय मोती, मौल्यवान दगड, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खते, रासायनिक उत्पादने देखील आयात केली जातात.
इराणकडून काय काय आयात करतो भारत? -आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इराणला १.२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून ४४१.९ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत इराणमधून कच्चे तेल, सुका मेवा, केमिकल्स, काचेची भांडी आयात करतो. याशिवाय, बासमती तांदूळ, चहा, कॉफी आणि साखर निर्यात केली जाते.या वस्तूंच्या किंमती वाढणार -तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते, यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीच प्रभावित होईल. परिणामी आयात-निर्यात महाग होईल. याशिवाय, विमान भाडे देखील वाढू शकते. खरे तर, पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने, भारतीय विमान कंपन्या आखाती देशांकडून प्रवास करतात. युद्धादरम्यान, या विमान कंपन्यांना दुसरा मार्गही शोधावा लागेल.