विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 21:27 IST2025-05-25T21:26:05+5:302025-05-25T21:27:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली.

विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जातीय जनगणना आणि ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदींची नेतृत्व क्षमता, धाडस आणि दूरदृष्टी यांचे खूप कौतुक करण्यात आले. संपूर्ण युतीने पीएम मोदींच्या निर्णयांसोबत पूर्ण ताकदीने उभे राहण्याचा आणि त्यांना पुढे नेण्याचा संकल्प केला. एनडीए नेत्यांनी याबाबत राजकीय ठरावही मंजूर केले. भविष्यातील राजकारणही जातीय गणिते आणि ऑपरेशन सिंदूरवर केंद्रित राहील, असे संकेत स्पष्ट आहेत.
दरम्यान, येत्या काळात बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत, एनडीएने आपले मुद्दे आणि विचार दोन्ही स्पष्ट केले आहेत. विरोधी पक्ष आधीच जातीय जनगणनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही संबोधित करताना सर्वांचे ध्येय विकसित, मजबूत आणि स्वावलंबी भारत आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, आपण आपल्या राज्यांमध्ये या दिशेने वेगाने काम करावे, असे ते म्हणाले.
बैठकीबद्दल माहिती देताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, संपूर्ण एनडीएने जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला सुरुवातीपासूनच जात जनगणनेची कल्पना होती. आम्ही जातीवर आधारित राजकारण करत नाही, पण विकासाच्या शर्यतीत मागे राहिलेल्या समाजातील शोषित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणू इच्छितो.
या बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आणला होता, ज्याला आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मान्यता दिली. पंतप्रधान मोदी आणि एनडीए सरकारच्या निर्णयाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ऑपरेशन सिंदूरचा प्रस्ताव आणला होता, ज्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.
बैठक चार तास चालली
ठरावात सैन्याच्या शौर्याचे कौतुक करण्यात आले आणि या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचेही अभिनंदन करण्यात आले. याशिवाय दिल्लीत सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत नक्षलवाद्यांविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमेचे यश आणि मुख्य प्रवाहात परतणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या पुनर्वसन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यादरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निर्मूलनासाठी बनवलेल्या रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याबाबत सादरीकरण केले.
बैठकीतील इतर निर्णय
बैठकीत घेतलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांमध्ये, आणीबाणीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी लोकशाही वाचवा मोहीम मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा, केंद्रातील एनडीए सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 9 जून रोजी भव्य उत्सव साजरा करण्याचा आणि गेल्या 11 वर्षात केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.