विद्यार्थिनींनी रचला अपहरणाचा बनाव

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:21+5:302015-02-18T00:13:21+5:30

चेहडी येथील घटना : जळगाव रेल्वेस्थाकावर आढळल्या मुली

The girls made the kidnapping | विद्यार्थिनींनी रचला अपहरणाचा बनाव

विद्यार्थिनींनी रचला अपहरणाचा बनाव

हडी येथील घटना : जळगाव रेल्वेस्थाकावर आढळल्या मुली
नाशिकरोड : पत्ताविचारण्याच्या बहाण्याने एका इसमाने थांबविल्यानंतर पुढे आम्हाला थेट रेल्वेगाडीतच जाग आली अशी आपल्याच अपहरणाची कहाणी विद्यार्थिनीनी रचल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला.
चेहेडी पंपिंग येथील इयत्ता नववीतील तीन विद्यार्थिनी सकाळी शाळेत जादा तासिका असल्याने शाळेत जाण्यासाठी निघाल्या, मात्र दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका विद्यार्थिनीने आपल्या पालकांना दूरध्वनी करून आपण रेल्वेगाडीत असल्याचे सांगितले. सकाळी शाळेत जाताना
रस्त्यात टायर पंक्चरच्या दुकानाजवळ तीन ते चार अनोळख्या इसमांनी आम्हाला एक पत्ता वाचण्यास दिला. त्यानंतर आम्हाला काहीच कळले नाही. आता आम्ही रेल्वे गाडीत असून, जळगाव जवळ पोहोचलो असल्याचे सांगितले.
विद्यार्थिनींच्या या फोनमुळे पालकांना धक्काच पोहचला. मुलींचे अपहरण झाल्याची बाब गावात पसरल्याने एकच कल्लोळ उडाला. गावकर्‍यांनी धावतच शाळा गाठली असता तिघी मैत्रिणींपैकी एक शाळेत येऊन गेल्याचे समजले, तर दुसर्‍या दोघी शाळेत आल्याच नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. काही मिनिटांतच तीनही मुलींच्या पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आपल्या मुलींनी केलेल्या फोनवरील माहिती पोलिसांना सांगितले.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, उपनिरीक्षक रवींद्र कर्‍हे, ठाणे अंमलदार राजेंद्र वाघ यांनी तत्काळ जळगाव रेल्वे पोलीस ठाणे व तेथील अधिकार्‍यांना संपर्क साधला. मुलींनी ज्या मोबाइलवरून संपर्क केला होता. त्यावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो भ्रमणध्वनी एका शाहरूख नावाच्या इसमाला लागल्याने सार्‍यांनाच धडकी भरली. पोलिसांनी त्या इसमाची चौकशी केली असता प्रवासात त्या भेटल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यास मुलींना जळगाव रेल्वे पोलीस चौकीत सोडून देण्याचे सांगितले.
जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी रेल्वेस्थानकावर शोध घेण्यास सुरुवात केली. पादचारी पुलाजवळ त्या तिघी मुली रडत होत्या. ठाकूर यांनी त्या मुलींची व युवकांची विचारपूस केल्यानंतर नाशिकरोड येथील त्याच या तीन विद्यार्थिनी असल्याचे निष्पन्न झाले. ठाकूर यांनी नाशिकरोड पोलिसांना मुली सुखरूप असल्याचे कळविल्याने पालकांना धीर आला. ठाकूर यांनी एका रेल्वे पोलिसांसोबत सायंकाळी त्या तीनही मुलींना नाशिकरोडला पाठविले. सायंकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलिसांनी मुलींना पालकांच्या हवाली केले.
नाशिकरोडला आल्यानंतर या मुलींनी आपण बनाव रचल्याचे कबूल केले. शाळेत जादा तासिका होती. परंतु शाळेत जाण्याऐवजी आपण रेल्वेगाडीने लासलगावपर्यंत जाऊ असा विचार या तिघींनी केला. त्यातील एक मुलगी शाळेत आली मात्र शाळेतून लवकर निघाली त्यानंतर तिघींनीही नाशिकरोड स्थानक गाठले. तेथून त्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसल्या. परंतु गाडी लासलगाव येथे थांबत नसल्याने गाडी पुढे निघून गेली. त्यानंतर मात्र या मुली घाबरल्या आणि त्यांनी प्रवासातच एका सह प्रवाशाला विनंती करून त्याच्या भ्रमणध्वनीवरून पालकांना खोट्या अपहरणाची कहाणी सांगितली.
--इन्फो--
ठाकूर यांची तत्परता
जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे काही वर्षांपूर्वी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नाशिकरोडच्या तीन विद्यार्थिनी रेल्वेने जळगावला उतरल्याचे समजताच ठाकूर यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने तीनही विद्यार्थिनींना जळगाव रेल्वेस्थानकावर शोधून काढले. त्यानंतर त्यांना धीर देऊन दुपारी जेवण दिले व आपल्या पोलिसांसोबत त्या तिघींना रेल्वेने नाशिकरोडला पाठविले. ठाकूर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नाशिकरोड पोलीस व मुलींच्या पालकांनी त्यांना धन्यवाद दिले.

Web Title: The girls made the kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.