'भारताकडे कच्चे तेल आणि LPG चा मुबलक साठा', केंद्र सरकारची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:30 IST2026-03-16T16:30:07+5:302026-03-16T16:30:50+5:30
Fuel Crisis: आखाती देशातून तेल आणि LPG ची जहाजे भारताकडे रवाना!

'भारताकडे कच्चे तेल आणि LPG चा मुबलक साठा', केंद्र सरकारची मोठी माहिती
Fuel Crisis: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलपुरवठ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशवासीयांना दिलासा दिला आहे. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, LPG आणि CNGचा पुरवठा 100 टक्के सुरळीत सुरू आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशातील सर्व रिफायनऱ्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, पेट्रोल पंपांवरही कोणतीही अडचण नाही. सध्या कुठेही तेलटंचाईची कोणतीही नोंद मिळालेली नाही. पेट्रोल पंपही नियमितपणे सुरू आहेत.
कमर्शियल LPG वितरण सुरू
सुजाता शर्मा यांनी असेही सांगितले की, काही राज्यांमध्ये कमर्शियल LPGचे वितरण सुरू करण्यात आले आहे. सध्या घरगुती ग्राहकांना प्राधान्याने गॅस पुरवठा केला जात आहे. ऑनलाइन बुकिंगमध्ये वाढ झाल्यामुळे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोटा 53 टक्क्यांवरून 72 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कमर्शियल LPG प्रथम रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करून देणे, तसेच काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांकडून कारवाई केली जात आहे.
वितरण व्यवस्थेवर सतत देखरेख
जे ग्राहक LPGऐवजी PNG वापरण्यास इच्छुक आहेत, ते ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून किंवा ऑनलाइन पद्धतीने सहजपणे बदल करू शकतात. PNG कंपन्यांनी नवीन ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सही जाहीर केल्या आहेत, असेही शर्मा यांनी सांगितले.
तेल अन् LPG जहाजे भारताकडे रवाना
दरम्यान, भारत सरकारच्या शिपिंग मंत्रालयाने सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीहून 14 मार्चला निघालेले ‘लाडकी’ हे भारतीय जहाज सुमारे 81,000 टन कच्चे तेल घेऊन सुरक्षितपणे भारताकडे येत आहे. हे जहाज लवकरच मुंद्रा बंदरावर पोहोचणार आहे. याशिवाय ‘शिवालिक’ नावाचे LPG जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुज पार करून आज भारतात दाखल झाले आहे.
सरकारचा नागरिकांना संदेश
केंद्र सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशात तेल आणि गॅसचा पुरवठा स्थिर असून घबराटीचे कोणतेही कारण नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.