विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:45 IST2025-06-06T06:44:30+5:302025-06-06T06:45:49+5:30
आता राज्याबाहेर सीईटी केंद्र नसेल- तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधि अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांमध्ये बिहारच्या पाटणा शहरातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाल्यानंतर शिक्षण वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा निकाल महाराष्ट्र सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये गैरप्रकार झाल्याची शक्यता लक्षात घेऊन आता संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.
२०२४-२५ मध्ये एमबीएच्या सीईटीत परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यावेळी देखील महाराष्ट्राबाहेरील सीईटी परीक्षा केंद्रांवर घोटाळा झाला होता. मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्याबाहेरील ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाल्याने गैरप्रकाराचा संशय पुन्हा बळवला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे महाराष्ट्राबाहेर सीईटी कक्षाचे एकही केंद्र नसेल, असा ठोस निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग करणार कसून तपास
- ४ जूनला विधि अभ्यासक्रमाच्या एमएएच- एलएलबी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये बिहार राज्यातील पाटणा शहरातील ‘माही इन्फोटेक’ नावाच्या परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणाऱ्या संस्कृती सौंदर्या, प्रखर ज्योती, हिमांशू जायसवाल, विश्वेश पाठक या चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले. या विद्यार्थ्यांची आता चौकशी होणार आहे.
- एकाच परीक्षा केंद्रावर जेव्हा केवळ चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळतात, तेव्हा ही बाब अतिशय गंभीर आहे, असे म्हणत महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रकरणाची चौकशी तर होईलच, शिवाय राज्याबाहेर आता यापुढे कोणतेच परीक्षा केंद्र मंजूर केले जाणार नाही, अशी घोषणादेखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.