कारला भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबामधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण बदायूं येथील एका लग्नसमारंभातून दिल्लीला परतत होते, त्यादरम्यान, वाटेतच बुलंदशहर जिल्ह्यात हा अपघात झाला.
या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या वेळी कार चालवत असताना चालकाला झोप आली. त्यामुळे ही कार पुलावर आदळून पलटली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. मात्र अपघातानंतर कारचे दरवाजे लॉक झाल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती देताना बुलंदशहर पोलिसांनी सांगितले की, जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या जानीपूर चंदोस तिठ्याजवळ एक स्विफ्ट कार पुलावर आदळली. त्यानंतर या कारमध्ये आग लागली. या कारमधून एखाच कुटुंबातील सहा जण प्रवास करत होते. पैकी एक महिला बचावली तर इतर पाच जणांचा जळून मृत्यू झाला.
दिल्लीतील मालवीयनगर येथील रहिवासी तंबीज अहमद हे आपल्या आणि त्यांच्या भाओजींच्या कुटुंबीयांसह एका लग्नसोहळ्यासाठी बदायूं येथील एका गावात आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते दिल्लीला परत जात होते. त्या प्रवासादरम्यान, आज पहाटे त्यांच्या कारला हा अपघात झाला. या अपघातात तंबीज अहमद, त्यांचे भाओजी जुबैर, सलजनिदा, त्यांची पत्नी मोमिना आणि भाओजींचा अडीच वर्षांचा मुलगा जैनुल यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात गुलनाज ही एकमेव महिला बचावली आहे.
कार चालकाला झोप आल्याने कार पुलावर आदळून हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पीडितांच्या नातेवाईकांनी एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पुलावर आदळून तिला आग लागल्याचा दावा केला आहे.