अखेर बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप झाले; शरद यादव राजदच्या चिन्हावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 18:27 IST2019-03-22T17:49:06+5:302019-03-22T18:27:55+5:30
महाआघाडीने जागावाटपाबरोबरच काही जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली आहे.

अखेर बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप झाले; शरद यादव राजदच्या चिन्हावर लढणार
पटना : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी निवडणूक याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली असताना बिहारमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. अखेर आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली असून लालू प्रसाद यादवांच्या पक्षाला 40 पैकी 20 जागा मिळाल्या आहेत. तर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यादव यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले शरद यादव हे राजदच्या तिकिटावर लढणार आहेत.
महाआघाडीने जागावाटपाबरोबरच काही जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली आहे. राष्ट्रीय जनता दलाला 20 जागा, काँग्रेसला 9, रालोसपाला 5 आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाला 3 जागा मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त वीआयपीला 3 आणि राजदच्या कोट्यातून सीपीआयला 1 जागा दिली जाणार आहे.
नितिशकुमार यांनी काँग्रेस, राजदसोबतची आघाडी मोडून भाजपसोबत सत्ता थाटली आहे. यामुळे नाराज झालेल्या जेडीयुच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनामा देत लोकशाही जनता दलाची स्थापना केली होती. लोकसभेसाठी शरद यादव लालुंच्या राजदच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष राजदमध्ये समाविष्ट केला जाणार आहे, असे राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी सांगितले.
उपेंद्र कुशवाहा यांनी एनडीएला सोडचिठ्ठी देत महाआघाडीची साथ दिली होती. यावेळी त्यांना राजदने पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता.