आकडे खरे बोलतात, प्रत्येक भारतीय आर्थिक दबावात; महागाईवरून राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:33 IST2025-06-06T13:32:48+5:302025-06-06T13:33:27+5:30
"जनतेला लाचार करून सत्तेत राहणे हा त्यांचा अजेंडा"

आकडे खरे बोलतात, प्रत्येक भारतीय आर्थिक दबावात; महागाईवरून राहुल गांधींची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गेल्यावर्षी दुचाकींच्या विक्रीत १७% आणि कारच्या विक्रीत ८.६% घट झाली आहे. मोबाईल बाजारपेठेत ७% घट झाली आहे. दुसरीकडे, खर्च आणि कर्जे दोन्ही सतत वाढत आहेत. घरभाडे, घरगुती महागाई, शिक्षणाचा खर्च, जवळजवळ प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे. हे फक्त आकडे नाहीत. प्रत्येक सामान्य भारतीय ज्या आर्थिक दबावाखाली आहे त्याचे हे वास्तव आकडे असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्याला असे राजकारण हवे आहे जे इव्हेंट्सच्या झगमगाटाशी नव्हे तर सामान्य लोकांच्या वास्तवाशी जोडलेले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
जनतेला लाचार करून सत्तेत राहणे हा त्यांचा अजेंडा
२० वर्षे सत्तेत राहूनही, नितीशजींचे डबल इंजिन सरकार बिहारला सुरक्षा किंवा विकास देऊ शकले नाही. गुन्हेगारी, बेरोजगारी, स्थलांतर ही नितीश-भाजप सरकारची खरी ओळख बनली आहे. जनतेला लाचार करून सत्तेवर टिकून राहणे हा त्यांचा अजेंडा आहे. नितीश सरकार ‘न्याया’चे नव्हे तर सत्तेच्या राजकारणाचे प्रतीक बनले आहे. आता खूप झाले. अन्यायाचे हे चक्र तोडून बिहारला सुरक्षितता, स्वाभिमान आणि प्रतिष्ठेच्या मार्गावर पुढे नेण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
विकलांग व्यक्तींसाठी दिव्यांग हा शब्दप्रयोग प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. अशा सकारात्मक गोष्टींचे स्वागत करण्याऐवजी काही लोक अवमानकारक भाषा वापरत आहेत.
-ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री