Farmer Protest: शेतकऱ्याची आत्महत्या, दुसऱ्याचा थंडीने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 03:37 IST2020-12-18T03:36:27+5:302020-12-18T03:37:06+5:30
शेतकऱ्यांना करावा लागत आहे कडाक्याचा थंडीचा सामना; मागे न हटण्याचा बैठकीत निर्णय

Farmer Protest: शेतकऱ्याची आत्महत्या, दुसऱ्याचा थंडीने मृत्यू
- विकास झाडे
नवी दिल्ली : दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा आंदोलक शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. थंडीमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एकाने ट्रक्टरखाली येऊन आत्महत्या केली. दररोज होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून आता जराही मागे हटायचे नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी आज बैठकीत घेतला.
आंदोलनाचा २२ वा दिवस आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सोयी नाहीत. टिकरी सीमेवर थंडीने गारठल्याने हरियाणाच्या जय सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे बुधवारी बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येचे दु:ख अनावर झाल्याने जसवीर सिंह या शेतकऱ्यांने स्वत:ला ट्रक्टरखाली झोकून आत्महत्या केली. बाबा राम सिंह यांनी बुधवारी सिंघू सीमेवर स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होतीे. शेतकरी इतक्या वेदनेत असतांना केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नोंदविले होते. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून सिंघू सीमेवर गॅस हीटर लावण्यात आले आहेत. परंतु ते अपूर्ण आहेत व गॅसचा खर्चही शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
ज्येष्ठ वकील मांडतील बाजू
गरुवारी सिंघू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असणाºया शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. संघटनेचे सदस्य संदीप पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान आंदोलक संघटनांची बाजू ऐकून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने आठ संघटना पक्षकार केल्याची माहिती मिळत आहे. मात्र यापैकी भारतीय किसान युनियन (भानु) ही संघटना संयुक्त किसान मोर्चाचा घटक नाही व उर्वरित सात संघटनांना न्यायालयाकडून कोणतीही सूचना अद्याप प्राप्त झाली नाही. संयुक्त किसान मोर्चाच्या समितीने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संदर्भात प्रशांत भूषण, भूषण दवे, कोलीन गोनसाल्वीस, एच.एस. फुलका यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केली आहे.
दुभाजकावर बीजारोपण!
युपीगेट महामार्गावरील दुभाजकावर शेतकऱ्यांनी आता पालेभाज्या लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आंदोलन अधिक दिवस चालले तर भाजीपाला कामात येईल असे शेतकऱ्यांनी सांगितले.
‘दोन पावले मागे घ्यावीत’
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकेत यांनी शेतकरी आणि सरकारने दोन पावले मागे घेतली तर तोडगा निघू शकतो आणि आंदोलन मागे घेतल्या जाईल. सर्वोच्च न्यायालय तिसरा पक्ष बनून आल्याने लवकरच मार्ग निघेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
…म्हणून संत बाबा राम सिंह यांनी झाडून घेतली गोळी
चंदिगड - शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. या आंदोलनादरम्यान, संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा राम सिंह यांचे शिष्य असलेले गुलाब सिंह यांनी आत्महत्येमागचं कारण स्पष्ट केलं.
गुलाब सिंह यांनी सांगितले की, ९ डिसेंबर रोजी बाबाजींनी शेतकरी आंदोलनाला पाच लाख रुपयांची देणगी दिली होती. बुधवारी बाबा राम सिंह पुन्हा एकदा आंदोलनस्थळी पोहोचले होते. तिथे त्यांनी आपल्या सेवादारांना स्टेजवर जाण्यास सांगितले. बाबा राम सिंह गाडीत बसलेले होते. त्यानंतर त्यांनी एका पत्रात लिहिले की, अशा परिस्थितीत मी माझे शरीर या आंदोलनाला समर्पित करत आहे. कारमधील पिस्तुलाने त्यांनी गोळी झाडली.