मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:34 IST2018-04-30T02:34:57+5:302018-04-30T02:34:57+5:30

In the era of democracy in the times of Modi, the dizziness of Manmohan Singh! | मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात

मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात

शीलेश शर्मा
नवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांचा मोदी सरकारकडून ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे त्यावरून स्पष्ट होते की, या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला.
जन आक्रोश सभेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने कारस्थान रचून संसदेत येऊच दिला नाही. या प्रकारामुळे संसदेची प्रतिष्ठा धोक्यात आली. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. जगभरात तेलाचे भाव घसरत
आहेत पण मोदी सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविण्यात गुंतले आहे. नीरव मोदी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाबाहेर पळाला. अशा घोटाळ््यांमुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली आहे. या विपरित स्थितीतून बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्षाला जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही डॉ. सिंग यांनी केले. या जन आक्रोश सभेत गुलाम नबी आझाद, ए. के.अ‍ॅन्टोनी, चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, कॅप्टन अमरेंद्रसिंग, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, अशोक गहलोत आदी मान्यवर काँग्रेस नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला
सरकारी यंत्रणांचा वापर करून मोदी सरकार विरोधकांचा आवाज बंद करू पाहात आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. जन आक्रोश सभेत त्या बोलत होत्या. सत्य, अहिंसा व प्रेमाची जागा मोदींच्या कारकिर्दीत खोटारडेपणा, विद्वेष व हिंसेने घेतली आहे. देशातील घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असे सांगून सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकरी, मजूर, आदिवासी, युवक, सामान्य माणूस भयभीत झाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत. बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात वणवण भटकत आहेत. मोदींची सारी आश्वासने फोल ठरल्याचे जनतेला आता कळून चुकले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहिणीही त्रस्त आहेत. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार आणखी वाढला. प्रसारमाध्यमांवरील दबाव मोदींच्या काळात वाढला आहे. राज्यघटनेचे अस्तित्व धोक्यात आले असून तिला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात लढा दिला पाहिजे असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.

महागाई व भ्रष्टाचार वाढतोय... मोदींच्या राज्यात महागाई व भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे. सत्य, अहिंसा व प्रेमाची जागा मोदींच्या कारकिर्दीत खोटारडेपणा, विद्वेष व हिंसेने घेतली आहे. देशातील घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असेही त्या म्हणाल्या.

युवा, वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक - राहुल
काँग्रेस पक्षाला युवा कार्यकर्त्यांइतकीच वरिष्ठ नेत्यांचीही गरज आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जो ज्येष्ठ नेत्यांंचा अवमान करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राहुल गांधींनी दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा भाजपमध्ये अपमान करण्यात येतो. मात्र काँग्रेस आपल्या ज्येष्ठांना सन्मानानेच वागवेल, असे ते म्हणाले

वेगवेगळ्या मतांचा आदर
काँग्रेस पक्षात वेगवेगळ््या विचारांचे लोक आहेत. सलमान खुर्शिद यांनी व्यक्त केलेल्या मताचा मी आदर करतो. नानाविध दृष्टिकोन, मते व्यक्त करण्यास काँग्रेस पक्षात नेहमीच वाव असेल असेही ते पुढे म्हणाले.
साठ महिन्यांंचे काय झाले?
मोदी यांनी साठ महिन्यांत देशाचा कायापालट करू, असा विश्वास देशाला दिला होता. त्याचे काय झाले, असा सवालही राहुल यांनी केला.

हा तर ‘परिवार आक्रोश’
- अमित शहा
काँग्रेसची ही ‘जन आक्रोश रॅली’ प्रत्यक्षात सुरु होण्याआधीच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सत्तेतून दूर फेकल्या गेलेल्या एका ‘परिवाराची आक्रोश रॅली’ अशी खिल्ली उडविली. शहा यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, एकापोठोपाठ एका राज्यांतून जनादेशाने बाहेर फेकले गेलेले एक घराणेशाही कुटुंब आणि त्यांच्या हुजऱ्यांनी ‘जन आक्रोशा’चा कांगावा करावा यावरून ते किती कालबाह्य झाले आहेत हेच स्पष्ट होते.

Web Title: In the era of democracy in the times of Modi, the dizziness of Manmohan Singh!