शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:04 IST2025-07-13T06:04:37+5:302025-07-13T06:04:46+5:30

Operation Sindoor: चुकीची माहिती पसरवणे, सायबर हल्ल्यांचा धोका आणि डिजिटल माध्यमांचा शस्त्रासारखा वापर यामुळे संघर्षाचे नवे मार्ग तयार होत आहेत.

Enemy drone costs 5 lakhs, missile worth 10 lakhs is required to shoot it down...; Brigadier reveals the cost of Operation Sindoor... | शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...

शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...

ब्रिगेडियर हेमंत महाजन,

युद्ध सेवा मेडल

मुद्द्याची गोष्ट :  चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत आणि याचा परिणाम या भागातील स्थिरतेवर होऊ शकतो, असे गंभीर भाष्य भारताचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी नुकतेच केले. चुकीची माहिती पसरवणे, सायबर हल्ल्यांचा धोका आणि डिजिटल माध्यमांचा शस्त्रासारखा वापर यामुळे संघर्षाचे नवे मार्ग तयार होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताला एकाच वेळी तीनही सीमांवर अधिक सतर्क राहावे लागणार आहे. 


युद्ध म्हणजे केवळ शस्त्रांचा आणि सैनिकांचा संघर्ष नाही, तर ती एका देशाच्या सामर्थ्याची, रणनीतीची आणि नेतृत्वाची परीक्षा असते. युद्ध सजीव असते. त्यात प्रत्येक हालचालीमागे उद्दिष्टं असतात, आणि ती साध्य झाल्यानंतरच युद्धाचं यश मोजलं जातं. ही टी-२० मॅच नाही की ज्यात निकाल प्रेडिक्टेबल असतो. दोन्ही बाजूंनी सैन्य असतं, सेनापती असतात, आणि दोघंही जिंकण्याच्या निर्धारानेच रणभूमीत उतरतात.

युद्धात कोण जिंकलं हे ठरवताना फक्त किती नुकसान झालं किंवा किती संसाधनं वापरली यावर नव्हे, तर आपलं मूळ उद्दिष्ट साध्य झालं का, यावर निर्णय घेतला जातो. उदाहरणार्थ, जर एखादं दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करणं हे लक्ष्य असेल आणि त्यातून पुढील काही वर्षांत दहशतवादी गट निष्क्रिय झाले, तर हे ध्येय यशस्वी झालं, असं मानलं जातं. याच संदर्भात भारताने अलीकडे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे नमूद करण्यासारखं आहे. या मोहिमेद्वारे भारताने सुमारे २५० दहशतवादी नष्ट केले, जे भारताचं मुख्य उद्दिष्ट होतं. परिणामी, पाकिस्तानला सैनिकी दृष्टिकोनातून मोठं नुकसान सहन करावं लागलं आणि काही काळासाठी का होईना, दहशतवादी हालचालींना मोठा झटका बसला.

कोणत्याही युद्धात नुकसान होणं हे अपरिहार्य असतं. पण रणनीती ही अशी असावी की आपल्या तुलनेत शत्रूचं जास्त नुकसान व्हावं. समजा, भारताची चार विमाने पडली, तर पाकिस्तानची सहा-सात विमाने पाडणं हे यश मानलं जातं. भारताने हल्ला परतवलाच नाही, तर त्याही पुढे जाऊन पाकिस्तानचे विमानं, ड्रोन, रडार सिस्टीम यांवर निर्णायक आघात केले.

माहिती उघड करणे की गुप्त ठेवणे?
भारताची विमाने किती पडली, याबाबत पारदर्शकता का नाही, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. पण युद्धात प्रत्येक गोष्ट जाहीर केली तर शत्रू त्यातून आपली रणनीती, क्षमतांची मर्यादा यांचं विश्लेषण करू शकतो. त्यामुळे अशा संवेदनशील बाबी गुप्त ठेवणं हे एक आवश्यक धोरण आहे. आपल्या विमानांनी पाकिस्तानची कोणती शस्त्रं निष्प्रभ केली, हे जर त्यांना समजलं, तर ते त्या दिशेने सुधारणा करतील.

पाकिस्तान : चीनची प्रयोगशाळा
चीनकडून पाकिस्तानला सातत्याने अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा होतो. पाकिस्तान हे चीनसाठी एक ‘फिल्ड टेस्टिंग ग्राउंड’ आहे. 
स्वतः चीन भारताशी थेट संघर्ष टाळतो; पण पाकिस्तानला भारताविरुद्ध झुंजवतो. या संघर्षातून चीन आपली शस्त्रं प्रभावी ठरतात की नाही, हे तपासत असतो. 
मात्र, यावेळी चीनच्या शस्त्रांनी अपेक्षित कामगिरी केली नाही, हे स्पष्ट झालं. त्याउलट, भारताची स्वदेशी ‘मेक इन इंडिया’ शस्त्रं - जसे की आकाशतीर, ड्रोन, मिसाइल्स - यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 
राफेल आणि सुखोईसारख्या भारतीय वायुदलाच्या ताकदीने पाकिस्तानची पार धूळधाण केली.

शस्त्रांच्या योग्य वापराचे आर्थिक शहाणपण
युद्धात ‘किंमत-परिणाम’ तत्त्व फार महत्त्वाचं असतं. जर शत्रू ५ लाख रुपयांचे ड्रोन हल्ल्यासाठी पाठवतो, आणि आपण त्यांना १० लाखांचे मिसाइल्स वापरून पाडतो, तर हे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचं ठरत नाही. भारताची अँटी-एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ही समतोल आणि परिणामकारक आहे. तिने शत्रूचे विविध हल्ले अचूकपणे रोखले.

युद्धातून धडे आणि पुढील तयारी
प्रत्येक युद्ध काही ना काही शिकवून जातं. मागील अनुभव हे दिशा दाखवू शकतात; पण नवीन युद्धात नव्या रणनीतींची गरज असते. कारण रणभूमी, शस्त्रसामग्री, सैन्य संरचना आणि भौगोलिक परिस्थिती सतत बदलत असते.
युद्ध हे फक्त लढाई नव्हे, तर राष्ट्राच्या इच्छाशक्तीचं आणि दूरदृष्टीचं परीक्षण असतं. भारताचं उद्दिष्ट ठाम होतं - दहशतवाद्यांना जबर झटका देणं - आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यात भारत यशस्वी ठरला. आपल्या शस्त्र सज्जतेची आणि सैन्याच्या क्षमतेची कसोटी या युद्धात झाली आणि भारताने ताकद सिद्ध केली.
-शब्दांकन : नम्रता फडणीस

Web Title: Enemy drone costs 5 lakhs, missile worth 10 lakhs is required to shoot it down...; Brigadier reveals the cost of Operation Sindoor...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.