वाघेला गटाच्या 'त्या' दोन आमदारांचं मत रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 23:56 IST2017-08-08T23:39:44+5:302017-08-08T23:56:10+5:30

निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या भोलाभाई आणि राघवजीभाई पटेल यांची मतं रद्दबातल ठरवली आहेत.

ElectionCommission accepts Congress demand, declares votes of 2 Congress MLAs invalid | वाघेला गटाच्या 'त्या' दोन आमदारांचं मत रद्द

वाघेला गटाच्या 'त्या' दोन आमदारांचं मत रद्द

नवी दिल्ली, दि. 8 - भोलाभाई आणि राघवजीभाई या दोघांनी आपल्या मतपत्रिका भाजपाच्या पोलिंग एजंटला दाखवल्याचे काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहील यांनी सांगितल्यानंतर राजधानी दिल्लीत अनेक घडामोडींना वेग आला होता. मात्र आता निवडणूक आयोगानं याला पूर्णविराम दिला आहे.

निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या भोलाभाई आणि राघवजीभाई पटेल यांची मतं रद्दबातल ठरवली आहेत.वाघेला गटाच्या एकूण 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं. त्यातील दोन आमदारांची मतं निवडणूक आयोगानं रद्द केली आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही दोन मते रद्द व्हावीत अशी केलेली मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. आज दिवसभरात 176 आमदारांनी मतदान केले होते. आपला विजय निश्चित होईल असा विश्वास अहमद पटेल यांनी व्यक्त केलाय. मात्र तरीही निकाल हाती येईपर्यंत काहीही घडामोडी घडू शकतात, असे राजकीय विश्लेषक म्हणाले आहेत. काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातून अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झालीय.

अहमद पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांनी 1976 साली प्रवेश केला. 1977 पासून तीन टर्म ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर प्रदेश काँग्रेस आणि केंद्र पातळीवर त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यानंतर 1993-99, 1999-2005, 2005-2011, 2011-2017 अशा सलग चार टर्म ते राज्यसभेत आहेत. संपुआ सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Web Title: ElectionCommission accepts Congress demand, declares votes of 2 Congress MLAs invalid