लखनऊ: एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे मात्र उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशात नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. भाजपमधील काही वरिष्ठ नेतेमंडळी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. या भाजप नेत्यांनी राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांशी अलीकडेच चर्चा केली असून, आपला फिडबॅक कळवला आहे. त्यामुळे आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (up election 2022 bjp leader praise for cm yogi adityanath)
उत्तर प्रदेशच्या २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी मागील पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील करोना परिस्थितीचे उत्तम व्यवस्थापन केल्याचे सांगत कौतुक केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील नेतृत्व बदलांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत मिळेल?; केंद्रानं केलं स्पष्ट
योगींनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली
गेल्या पाच आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. उत्तर प्रदेशातील दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या ९३ टक्क्यांनी कमी केली. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २० कोटींहून अधिक आहे, हे लक्षात असू द्यावी. अन्यथा १.५ कोटी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकेचे मुख्यमंत्रीही असे व्यवस्थापन करू शकत नाही. योगींनी उत्तम व्यवस्थापन केले आहे, असे ट्विट बी. एल. संतोष यांनी केले आहे.
मोदी आणि शाह यांचा पाठिंबा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा योगी आदित्यनाथ यांना असल्याचे स्पष्ट संकेत भाजपाच्या नेत्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाचा कारभार, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, स्वच्छ प्रतिमा यासारख्या गोष्टींमुळे योगी राज्यामध्ये लोकप्रिय असल्याचा विश्वास दिल्लीतील नेतृत्वाला असल्याचे म्हटले जात आहे.
गरज पडली तर अमेरिकेशीही टक्कर घेऊ; बेंजामिन नेतन्याहू यांचा स्पष्ट इशारा
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राधा मोहन सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील नेतृत्वबदलाच्या चर्चा काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. संतोष यांच्यासोबत लखनऊच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांची भेट घेतली.