विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, १ एप्रिलपासून लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 10:58 IST2026-03-29T10:58:24+5:302026-03-29T10:58:24+5:30
यासंदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, १ एप्रिलपासून लागू
नवी दिल्ली: भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांनी आगमनापूर्वी ७२ तासांच्या आत डिजिटल ई-अरायव्हल कार्ड सबमिट करणे अनिवार्य आहे. हे अधिकृत अॅप्स किंवा संकेतस्थळांद्वारे केले जाऊ शकते. यासंदर्भातील नवीन प्रवास नियम येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
विदेशी प्रवासी दुसऱ्या देशात आगमनापूर्वी विमानात, विमानतळावर कागदी अर्ज भरत असत. आता त्याची जागा ई-अरायव्हल कार्ड या सुलभरीत्या भरता येईल अशा ऑनलाइन अर्जाने घेतली आहे. त्यामुळे भारतात प्रवेश करण्याची प्रक्रिया जलद होते आणि प्रतीक्षा वेळ कमी होतो.
योजना भारत का राबवणार आहे?
सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएईमध्ये ई-अरायव्हल कार्डची योजना आहे. परदेशी प्रवासी भारतात आल्यानंतर त्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदी फॉर्म भरावे लागत. त्यात काही समस्या उद्भवत होत्या. हा फॉर्म ऑनलाइन भरता येत असल्याने बनावट नोंदींना रोखता येते. म्हणून भारतही ही योजना राबविणार आहे.
विसरल्यास, टाळल्यास काय होईल ? ई-अरायव्हल कार्ड भरणे विसरलात किंवा टाळलेत तरी तुम्ही भारतात प्रवेश करू शकता. त्यासाठी बंदी किंवा दंड नाही. पण, अतिरिक्त तपासणीसाठी इमिग्रेशन तुम्हाला बाजूला घेईल, रांगा लांबतील आणि प्रवास ताणतणावयुक्त होईल.
कोणती माहिती आवश्यक आहे?
पासपोर्टचा क्रमांक, पासपोर्ट जारी केल्याची व तो संपुष्टात येणार असल्याची तारीख येणार
विमानाचा तपशील : क्रमांक, आगमन तारीख, विमानतळ प्रवाशाचा फोन नंबर आणि ईमेल भेटीचे कारण (पर्यटन, काम, अभ्यास) भारतातील निवासस्थान (हॉटेलचे नाव व पत्ता)
अर्ज कुठे भरता येईल ? हा अर्ज भरण्यासाठी तीन अधिकृत मार्ग आहेत. ही मोफत सेवा आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनचे संकेतस्थळ : boi.gov.in इंडियन व्हिसा ऑनलाइन पोर्टल : indianvisaonline.gov.in Su-Swagatam अॅप
ई-अरायव्हल कार्ड म्हणजे काय?
डिजिटल ई-अरायव्हल कार्डसाठी ऑनलाइन अर्ज फोन किंवा संगणकाद्वारे भरता येईल. विमानाच्या आगमनापूर्वी ७२ तासांच्या आत हा अर्ज भरून सादर करा. त्यानंतर संबंधित प्रवाशाला क्यूआर कोड मिळतो. भारतात विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना हा कोड दाखवा, ते तो स्कॅन करतील भारतात प्रवेशाची प्रक्रिया लवकर पार पडेल.
कोणत्या प्रवाशांनी हे अर्ज भरायचे
भारतीय नागरिकांना डिजिटल ई-अरायव्हल कार्डसाठी अर्ज भरायची गरज नाही. परदेशी प्रवासी आणि ओव्हरसीज सिटिझनच दर्जा असलेल्यांना हा अर्ज करावा लागेल. या पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक हे प्रवासी समाविष्ट आहेत. एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांची नावे एका अर्जात नमूद करता येतील.