Mamata Banerjee: ज्ञानेश कुमार अहंकारी, उर्मट; वर्तन जमीनदारासारखे, ममता बॅनर्जी गरजल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:14 IST2026-02-03T12:12:22+5:302026-02-03T12:14:30+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक यादींच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चर्चेला बोलावले; पण ही बैठक ममता बॅनर्जी यांनी अर्धवट सोडत आयोगाने आपल्या शिष्टमंडळाचा अपमान केल्याचा आरोप केला.

Mamata Banerjee: ज्ञानेश कुमार अहंकारी, उर्मट; वर्तन जमीनदारासारखे, ममता बॅनर्जी गरजल्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने प. बंगालमधील निवडणूक यादींच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चर्चेला बोलावले; पण ही बैठक ममता बॅनर्जी यांनी अर्धवट सोडत आयोगाने आपल्या शिष्टमंडळाचा अपमान केल्याचा आरोप केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अहंकारी असून, आम्ही त्यांचे नोकर असल्यासारखे तसेच एखाद्या जमीनदारासारखे त्यांचे वर्तन होते, असा आरोप त्यांनी केला. असा आयोग यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. हा आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असून, एसआयआर प्रक्रियेत बूथ लेवल अधिकारी आणि नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांसाठी हा आयोगच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही मैदानात उतरून लढू, असाही इशारा त्यांनी दिला.
निवडणूक आयोगाने फेटाळले सर्व आरोप
आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावताना सांगितले की, तृणमूलच्या नेत्यांना सविस्तरपणे ऐकून घेतले गेले. अभिषेक बॅनर्जी आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मांडलेले मुद्दे नोंदवून घेतल्यानंतर आयोग उत्तर देत असताना वारंवार व्यत्यय आणला गेला आणि त्यानंतर त्या संतप्त होऊन बैठक सोडून गेल्या. आयोगाने ‘कायद्याचे राज्य प्रस्थापित राहील’ आणि एसआयआरच्या कामात कोणताही दबाव, अडथळा किंवा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. तसेच बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे मानधन वेळेत देण्याचे निर्देश दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
काळ्या शालीने निषेध
आयोगाने बोलावलेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी, खासदार कल्याण बॅनर्जी तसेच पश्चिम बंगालमधील ‘एसआयआरमुळे बाधित कुटुंबां’चे १२ सदस्य सहभागी होते. या शिष्टमंडळाने काळी शाल परिधान करून निषेध बैठकीत बहिष्कार केला. ममता यांनीही काळी शाल परिधान केली होती.
दिल्लीत ‘बंग भवन’वर पोलिसांशी वाद
ममता बॅनर्जी यांचा सोमवारी दिल्लीतील बंग भवनबाहेर तैनात पोलिसांशी वाद झाला. आपण कोणत्याही आंदोलनासाठी नव्हे, तर एसआयआर प्रक्रियेमुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी राजधानीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.