हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:37 IST2025-08-08T14:36:42+5:302025-08-08T14:37:21+5:30
ढगफुटीत जखमी झालेल्या काही लोकांना उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
धराली दुर्घटनेला तीन दिवस उलटूनही धरली गावाशी संपर्क होऊ शकत नाही. अनेक लोकांचे नातेवाईक अजूनही धरालीमध्ये अडकले आहेत. भारतीय सैन्य वेगाने बचावकार्य करत आहे. लोक हेलिकॉप्टरने धरालीला जात आहेत, जेणेकरून ते तिथे त्यांच्या नातेवाईकांना शोधू शकतील. एनडीटीव्हीने एका महिलेशी संवाद साधला. तेव्हा महिने रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू? असं म्हणत बहिणीने टाहो फोडला. भाऊ सुखरूप सापडावा अशी ती आशा करत आहे.
ढगफुटीत जखमी झालेल्या काही लोकांना उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, नंतर त्यांना ऋषिकेश एम्समध्ये रेफर करण्यात आलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या अमरदीप सिंह या रुग्णाने सांगितलं की, मी कँपमध्ये होतो. अचानक स्फोटाचा आवाज आला. मला वाटले की सैन्याकडून काहीतरी केलं जात असेल. पण जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला समजलं की हा ढगफुटीचा आवाज होता. मी पळालो म्हणून माझा जीव वाचला. हे खूप भयानक दृश्य होतं. आपल्या जवानांनी सर्वांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला.
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
उत्तराखंडच्या धराली भागातून आतापर्यंत ३६७ लोकांना वाचवण्यात आलं आहे. ढगफुटी झाल्यानंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड कहर झाला. अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि या काळात या भागात शेकडो लोक अडकले होते. सध्या युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव कार्यातून ३६७ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. उत्तराखंडमध्ये हवामानात बदल झाल्यानंतर बचावकार्याला वेग आला आहे. चिनूक हेलिकॉप्टरच्या मदतीने बाधित भागात मदत पोहोचवली जात आहे. तिथे अवजड यंत्रसामग्री आणि लॉजिस्टिक साहित्य पाठवण्यात येत आहे.
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
११२ लोकांना डेहराडूनला विमानाने हलवण्यात आलं. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर धराली परिसरात अजूनही काही लोक बेपत्ता असल्याची भीती आहे. उत्तराखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी, लष्कर, अग्निशमन आणि महसूल यांची पथकं आपत्तीस्थळी मदत आणि बचावकार्यात गुंतलेली आहेत.