"राष्ट्रपतींचे पद राजकारणापलीकडे, पण टीएमसीने सर्व मर्यादा ओलांडल्या"; पंतप्रधान मोदींचा ममतांवर थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 22:15 IST2026-03-07T22:07:10+5:302026-03-07T22:15:30+5:30
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

"राष्ट्रपतींचे पद राजकारणापलीकडे, पण टीएमसीने सर्व मर्यादा ओलांडल्या"; पंतप्रधान मोदींचा ममतांवर थेट निशाणा
PM Modi on Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमावरून सुरू झालेला प्रोटोकॉलचा वाद आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेस सरकारवर लाजिरवाणी वागणूक दिल्याची टीका केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती भाजपच्या अजेंड्यात अडकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
नेमका वाद काय?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ९ व्या आंतरराष्ट्रीय संथाल कॉन्फरन्ससाठी सिलीगुडी येथे पोहोचल्या होत्या. मात्र, तिथे त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री किंवा राज्याचा कोणताही मंत्री उपस्थित नसल्याने प्रोटोकॉलचा प्रश्न उपस्थित झाला. यावर राष्ट्रपतींनी स्वतः जाहीर नाराजी व्यक्त केली. महत्त्वाच्या कार्यक्रमात राज्य सरकारचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अत्यंत छोटी जागा निवडल्याने हजारो संथाल बांधवांना कार्यक्रमात येता आले नाही, असे मुद्दे राष्ट्रपतींकडून उपस्थित करण्यात आले. "मला एखाद्या छोट्या मैदानात बोलावून तातडीने परत पाठवण्याची व्यवस्था केली असावी," अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी ममता बॅनर्जींचा उल्लेख 'लहान बहीण' असा केला, पण कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"हे लोकशाहीसाठी दुर्दैवी"; पंतप्रधान मोदींचा घणाघात
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "राष्ट्रपतींसोबत झालेली ही वागणूक अत्यंत लाजिरवाणी आहे. लोकशाही आणि आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ही क्लेशदायक घटना आहे. संथाल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे बंगाल सरकारने दाखवलेली निष्काळजी अक्षम्य आहे," असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
ममता बॅनर्जींचे प्रत्युत्तर
कोलकाता येथील धरणे आंदोलनावरून बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर पलटवार केला. "राष्ट्रपतींना भाजपने स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी पाठवले आहे. त्या भाजपच्या राजकारणात अडकल्या आहेत," असा थेट आरोप ममतांनी केला. "या कॉन्फरन्सचे आयोजन राज्य सरकारने केले नव्हते. त्याचे आयोजक कोण होते किंवा फंडिंग कोठून आले, याची आम्हाला काहीच माहिती नव्हती," असे स्पष्टीकरण ममतांनी दिले. "तुम्ही निवडणुकीच्या वेळी आलात तर माझ्यासाठी प्रत्येक वेळी हजर राहणे शक्य नाही. मी सध्या लोकांच्या हक्कासाठी लढत आहे," असेही त्या म्हणाल्या.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची भीती?
ममता बॅनर्जी यांनी यावेळी केंद्रावर मोठा आरोप केला. बंगालची फाळणी करण्यासाठी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी हे सर्व कारस्थान रचले जात असल्याचे त्या म्हणाल्या. "बंगाल निवडणुकीनंतर आमचे लक्ष्य दिल्ली असेल आणि आम्ही भाजपचा खरा चेहरा देशाला दाखवू," असा इशाराही त्यांनी दिला.