नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे खासदार सुशील गुप्ता, आतिशी मार्लेना आणि आमदार मनोज कुमार यांना दिल्ली कोर्टाने 7 जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते राजीव बब्बर यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने या सर्वांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
याआधी अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी समर विशाल यांनी अरविंद केजरीवाल आणि इतर आरोपींना 30 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, आज झालेल्या सुनावणीत राजीव बब्बर यांनी अरविंद केजरीवाल, आतिशी मार्लेना, सुशील गुप्ता आणि मनोज कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु, कोर्टाने या सर्वांना 7 जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपाकडून दिल्लीतील मतदार यादीतील मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यासह इतरांनी केला होता. त्यामुळे भाजपाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत भाजपा नेते राजीव बब्बर यांनी कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या निष्पक्षपणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी अनेक युजर्सच्या ट्विटला रिट्विट करत निवडणूक निष्पक्षपणे होते आहे काय, असा प्रश्न विचारला होता. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी बायोकॉनची संस्थापक किरण मुजुमदार शॉ यांच्या ट्विटला रिट्वट करत सांगितले की, भारतातल्या अनेक लोकांची नावे मतदार यादीतून काढण्यात आली आहेत, असा एक रिपोर्ट समोर आला आहे. सर्वच खराब ईव्हीएम मशिनमध्ये केलेले मतदान हे भाजपाला जात असल्याचा आरोपही दुसऱ्या एका ट्विटला रिट्विट करत केजरीवालांनी केला होता.