"6300 कोटीत MLA खरेदी करतात आणि म्हणतात भ्रष्टाचाराशी लढतोय", केजरीवालांचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:17 IST2022-08-29T14:16:24+5:302022-08-29T14:17:03+5:30
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मित्रांचे 10 लाख कोटी खाल्ले, 6300 कोटींना आमदार विकत घेतले आणि लाल किल्ल्यावर उभा राहून म्हणतात मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय.'

"6300 कोटीत MLA खरेदी करतात आणि म्हणतात भ्रष्टाचाराशी लढतोय", केजरीवालांचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मित्रांचे 10 लाख कोटी खाल्ले, 6300 कोटींना आमदार विकत घेतले आणि लाल किल्ल्यावर उभा राहून म्हणतात मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय.'
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या विश्वासदर्शक ठरावामुळे भाजपचे ऑपरेशन लोटस आम आदमी पक्षाने अपयशी ठरवले आहे. सोमवारी दिल्ली विधानसभेत सभागृहाचे कामकाज गदारोळात सुरू झाले. भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सभापतींनी त्यांना मार्शल आऊट केले.
भाजपच्या कर धोरणावर हल्लाबोल करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज संपूर्ण देश महागाईच्या प्रभावाने त्रस्त आहे. केंद्र सरकारने दूध, दही, लस्सी, ताक, गहू, तांदूळ आणि मीठ यावरही कर लावला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात कोणत्याही सरकारने इतका कर लावला नाही. सरकार तर सोडा, इंग्रजांनीही इतका कर लावला नव्हता. देशातील अनेक घरांमध्ये आता एक वेळ भाजी घेणे कमी झाले आहे. दूध घेणे बंद केले आहे."
देशातील प्रत्येक गोष्टीवर कर लावून मिळणारी अब्जावधी आणि ट्रिलियन कमाई ते कुठे खर्च करत आहेत? हा पैसा जातो कुठे? त्याचे काही कोट्यधीश मित्र आहेत, ज्यांनी बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यानंतर त्याच्या मित्रांचा हेतू चुकला आणि ते कर्ज त्यांना जमा करायचे नाही. त्याला त्याच्या मित्रांचे कर्ज माफ झाले आहे. तेही 10 लाख कोटी रुपये, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्याबाबत दिल्लीत विश्वासदर्शक ठरावादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले, "ते नौटंकी करत होते, दारूमध्ये पैसे खाल्ले. आम्ही 10 वेळा विचारले की, छाप्यात काय सापडले? काही बाहेर आले नाही. आता आजपासून आदेश आला आहे : आता दारूवर बोलायचे नाही. आता विचारा नवीन वर्गखोल्या का बांधल्या? शौचालये का बांधली? हो, बांधल्या..काय चुकीचे केले?"
याचबरोबर, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपवर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांची सरकारे पाडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत ते झारखंडचे सरकार पाडणार आहेत. राज्यातील सरकार पाडण्यासाठी त्यांनी 6300 कोटी खर्च केले. हा पैसा कुठून आला? महागडे डिझेल आणि पेट्रोल खरेदी घेऊन आम्ही सर्वांनी हे पैसे दिले. आता जेव्हा जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील तेव्हा तुम्हाला समजेल की कोणत्या ना कोणत्या राज्यातील सरकार पडणार आहे, त्यामुळेच आमदारांची खरेदी-विक्री करता, यावी म्हणून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.