दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:23 IST2025-11-13T12:21:59+5:302025-11-13T12:23:35+5:30
Delhi Blast: जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत IPS अधिकारी डॉ. जी.व्ही. संदीप यांच्या सतर्कतेमुळे शेकडो जणांचे प्राण वाचले.

दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
Delhi Blast:दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर दररोज नवनवे खुलासे होत आहेत. तपासात असे दिसून आले आहे की, या स्फोटामागे केवळ दिल्लीच नव्हे, तर देशातील इतर अनेक शहरांना हादरवण्याची तयारी होती. या भीषण कटाचा पर्दाफाश करण्यात आयपीएस अधिकारी डॉ. जी. व्ही. संदीप चक्रवर्ती यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे.
मोठा कट उघडकीस
फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडल्याने आरोपी डॉ. उमर भयभीत झाला आणि त्याने घाईघाईत दिल्लीतील हल्ला घडवून आणला, अशी माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे. अटक केलेले सर्व दहशतवादी एका व्यापक कटाचा भाग होते आणि तो कट उधळण्यात डॉ. संदीप यांचे प्रचंड योगदान आहे.
एका पोस्टरमधून झाला खुलासा
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम भागात 17 ऑक्टोबर रोजी उर्दू भाषेत काही पोस्टर लावलेले दिसले. त्यावर जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या कमांडर हंजला भाईचे नाव होते. पहिल्या नजरेत हे पोस्टर साधे वाटले, पण श्रीनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. जी. व्ही. संदीप चक्रवर्ती यांनी त्यामागील धोका ओळखला.
कश्मीरमध्ये डॉ. संदीप यांना ‘आतंकवाद्यांचा कर्दनकाळ’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी ‘ऑपरेशन महादेव’चे नेतृत्व केले होते आणि दहशतवादी नेटवर्क्सविषयी सखोल माहिती मिळवली होती. त्यांनी पोस्टर प्रकरणाची तपासणी सुरू केली, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातून तीन संशयित ओळखले गेले, जे यापूर्वी दगडफेक प्रकरणात सामील होते. या तपासातून जम्मू-कश्मीरपासून हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरलेले नेटवर्क उघडकीस आले.
कश्मीरी डॉक्टरांचा दहशतवादी कट
आयपीएस संदीप यांनी पोस्टर पाहून धोका ओळखला आणि त्याची सखोल चौकशी केली. पोस्टर प्रकरणात अटक झालेल्या मौलवी इरफान अहमद याच्या चौकशीतून एक व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी फरीदाबादमधून 2,900 किलो स्फोटक, बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि दोन ए.के. रायफल्स जप्त केल्या. तसेच, श्रीनगर, फरीदाबाद आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी मुजम्मिल, अदील अहमद आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आले.
वर्दीतील डॉक्टर
डॉ. संदीप यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे झाला. त्यांचे वडील डॉ. जी. व्ही. रामगोपाल राव हे सरकारी रुग्णालयात आरएमओ म्हणून कार्यरत होते, तर आई पी. सी. रंगम्मा आरोग्य विभागात अधिकारी होत्या. त्यांनी कुरनूल मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आणि 2014 मध्ये भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. 21 एप्रिल 2025 रोजी त्यांनी श्रीनगरचे एसएसपी म्हणून पदभार स्वीकारला. ही कश्मीरमधील सर्वात संवेदनशील पोस्ट मानली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनंतनाग, कुपवाडा आणि कुलगामसारख्या भागांतील दहशतवादी हालचाली निष्प्रभ करण्यात आल्या.
सहावेळा राष्ट्रपती पुरस्कार
दहशतवादविरोधी मोहिमांमधील पराक्रमाबद्दल डॉ. संदीप यांना सहा वेळा राष्ट्रपती पोलिस वीरता पदक (PMG) आणि चार वेळा जम्मू-कश्मीर पोलिस वीरता पदक मिळाले आहे. एकीकडे डॉक्टर दहशतवादी कारयांमध्ये सामील आहेत, तर दुसरीकडे वर्दीतील डॉक्टराने हा कट उघडकीस आणला आहे.