धाडसी आबा -१
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:19+5:302015-02-16T23:55:19+5:30
नक्षलवाद्यांची उडविली दाणादाण

धाडसी आबा -१
न ्षलवाद्यांची उडविली दाणादाण आबा शिरले होते थेट मृत्यूच्या गुहेत : पोलिसांनाही भरले कापरे नागपूर : १२ महिन्यांच्या काळात तीन घातपात घडवून ५३ पोलिसांचे बळी घेतल्यामुळे गडचिरोलीतील पोलीस दल अक्षरश: थरारले होते. या काळात आर.आर. पाटील पालकमंत्र्याच्या रूपाने ढाण्या वाघासारखे नक्षल्याच्या गुहेत शिरले आणि पुढच्या चार वर्षांत त्यांनी नक्षलवाद्यांची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. आबांच्या निधनाने कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्यांनाही आठवणींचा गहिवर दाटून आला आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशील तेवढ्याच धाडसी आबांच्या आठवणींचे काही थरारक किस्से आज उघड केले.२००९-१० मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड हैदोस घातला. चुहामाकड, हत्तीटोला आणि मरकेगाव परिसरात मोठ्या घातपाती घटना घडविल्या. या अवघ्या तीन घटनांमध्ये नक्षलवाद्यांनी ५३ पोलिसांचे बळी घेतले. नक्षल्यांच्या क्रौर्यामुळे पोलीस दल अक्षरश: शहारले होते. अशात आबांनी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी तेथे पोलीस अधीक्षक जयकुमार आणि अमितकुमार सैनी जि.प.चे सीईओ म्हणून कार्यरत होते. धानोरा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एक अशीच घटना घडली. पावसामुळे बस किंवा मोठे वाहन जायला मार्ग नव्हता. तेथे जाणे प्रचंड धोकादायक आहे, नक्षलवादी घात लावून बसले असू शकतात, असे सांगूनही आबांनी चक्क मोटरसायकलवरच घटनास्थळ गाठले. त्यांच्या धाडसाला त्यावेळी सर्वांनीच सलाम केला. यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून वीरेश प्रभू रुजू झाले. सिरोंचा, एटापल्ली, कोरची, चामोर्शी, मूलचेरा भागात नक्षल्यांचा हैदोस सुरू होता. हत्या, अपहरण, जाळपोळ, धमक्यांमुळे या भागातील नागरिक (अन् पोलिसही) धास्तावलेले होते. कुणी तिकडे फिरकण्याची तसदी घेत नव्हते. आबांनाही पोलिसांनी या भागात फिरण्यास मनाई केली. मात्र, आबांनी हसत हसतच पोलीस अधीक्षक प्रभूंना सोबत घेतले अन् दोन दिवसात सहा तालुक्यांचा दौरा केला. नागरिकांना आणि पोलिसांनाही आश्वस्त केले. ---जोड आहे