नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे भारतासह संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील शाळा, कॉलेज आणि सर्व थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन सर्व थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, ज्या शाळा आणि कॉलेजमध्ये परीक्षा सुरू नाहीत, त्या शाळा आणि कॉलेज सुद्धा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहेत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये बायोमॅट्रिक अटेंडेंसला स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरचा फटका 100 हून अधिक देशांना बसल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने जगात महारोगराई पसरल्याचे घोषित केले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत सगळे व्हिसा रद्द केले आहे. परदेशातून येणाऱ्या व्यक्तींपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र राजदूत, संयुक्त राष्ट्र, महत्त्वाच्या प्रकल्पांवरील अधिकाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
जगभरातून भारतात येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा 13 मार्चपासून (उद्या) रद्द होतील. 15 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही या कालावधीत प्रवेश दिला जाणार नाही. जगभरात कोरोनाचा झालेला फैलाव आणि दुबई, अमेरिकेसह काही देशांतून परतलेल्या भारतीयांमध्ये दिसून आलेली कोरोनाची लक्षणं या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना (ओएसआय कार्डधारक) देशात व्हिसामुक्त प्रवास करता येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही 15 एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही.