CoronaVirus News: कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७२ टक्के, तर ५० हजारांहून अधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:06 IST2020-08-18T03:06:35+5:302020-08-18T03:06:44+5:30
रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.

CoronaVirus News: कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७२ टक्के, तर ५० हजारांहून अधिक बळी
नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोनाचे ५७,९८१ नवे रुग्ण आढळून आल्याने या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २६ लाख ४७ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९४१ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ५० हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या आजारातून आतापर्यंत १९,१९,८४२ लोक बरे झाले आहेत, तर रुग्णांची एकूण संख्या २६,४७,६६३ आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे प्रमाण ७२.५१ टक्के झाले आहे. या आजाराच्या एकूण बळींची संख्या ५०,९२१ वर पोहोचली आहे.
सध्या देशामध्ये ६,७६,९०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९२ टक्के आहे. कोरोना आजाराबाबत भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे. केंद्र व राज्य सरकारांनी दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेल्या वाढीमुळे रुग्ण शोधून काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने ते पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले.
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने काही निवडक जिल्ह्यांमध्ये केलेल्या सिरो सर्वेक्षणात मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमधील रहिवाशांत मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे प्रमाण बिहार, झारखंड, छत्तीसगढ या राज्यांमध्ये कमी आहे.
>कोरोना चाचण्यांनी गाठला तीन कोटींचा पल्ला
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, १६ आॅगस्ट रोजी ७,३१,६९७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता तीन कोटींपेक्षा अधिक झाली आहे.३ कोटी ४१ हजार ४00
इतकी त्यांची संख्या आहे. देशभरात ९६९ सरकारी प्रयोगशाळा व ५०० खासगी प्रयोगशाळांतून कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.