पुराचा आढावा घेण्यासाठी गेलो, गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले; पंजाबच्या मंत्र्यांच्या व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:38 IST2025-08-29T13:35:51+5:302025-08-29T13:38:43+5:30
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंजाबच्या तीन मंत्र्यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुराचा आढावा घेण्यासाठी गेलो, गोवा ट्रिपबद्दल बोलत बसले; पंजाबच्या मंत्र्यांच्या व्हिडीओ व्हायरल
Punjab Flood: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पंजाबमधील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला ज्यात पंजाब सरकारचे तीन मंत्री दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी तिन्ही मंत्री गोवा ट्रिप आणि तिथल्या क्रूझ ट्रिपबद्दल चर्चा करत होते. पुराची पाहणी करताना गोव्याच्या पर्यटनाबद्दल तिन्ही मंत्री चर्चा करत असल्याने विरोधकांनी आम आदमी पक्षाच्या सरकारला लक्ष्य केलं आहे.
पंजाबला महापुराचा तडाखा बसला आहे. अमृतसर, गुरुदासपूर, तरणतारन, कपूरथला यासह बहुतेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणांमधून पाणी सोडल्यामुळे रावी, सतलज, बियाससह सर्व नद्या आणि कालवे दुथडी भरून वाहत होते ज्यामुळे लाखो एकर जमीन आणि शेकडो गावे पाण्याखाली गेली. लोकांना त्यांची घरे सोडून त्यांच्या सामानासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. अशातच पंजाबच्या तिन्ही मंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये हरभजन सिंग, बरिंदर कुमार गोयल आणि लालजीत भुल्लर दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तिघांनाही ट्रोल करण्यात येत आहे. विरोधकांनीही सवाल करत आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. आतापर्यंत कोणत्याही नेत्याने या वादावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांच्या फेसबुक हँडलवरून लाईव्ह स्ट्रीम झालेल्या या क्लिपमध्ये भुल्लर, हरभजन सिंग आणि बरिंदर कुमार गोयल हे लाईफ जॅकेट घालून बोटीवर बसलेले दिसत होते. यावेळी हरभजन सिंग स्वीडनमधील क्रूझ आणि गोव्यात सुट्टी घालवल्याच्या आठवणी सांगत होते.
काही मिनिटांनंतर, त्याच अकाउंटवर एक औपचारिक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये मंत्र्यांनी लोकांना सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. तिन्ही मंत्र्यांना पंजाबच्या सीमावर्ती जिल्ह्यांचे पूर मदत प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण त्यांचा वक्तव्य व्हायरल झाला ज्याल जवळजवळ ९०,००० व्ह्यूज मिळाले आणि संतप्त प्रतिक्रियांचा पूर आला.