रोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:35 IST2019-09-22T02:18:28+5:302019-09-22T06:35:35+5:30
कॉँग्रेसने आपले निवडणूक मुद्दे समोर ठेवून या मुद्यांच्या आधारे निवडणूक जिंकून दाखवावी,असे आव्हान भाजपाला दिले

रोजगार, अर्थव्यवस्था, टाळेबंदी, शेतकरी प्रश्नांवर कॉँग्रेस लढणार
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरियाणामध्ये निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर कॉँग्रेसने आपले निवडणूक मुद्दे समोर ठेवून या मुद्यांच्या आधारे निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान भाजपाला दिले आहे.
पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी निवडणुकांच्या तारखांचे स्वागत केले. ज्या देशामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक या तत्वाची शिफारस केली जात असेल तेथे झारखंड आणि दिल्लीस वगळण्यात का आले? असा प्रश्नही केला. निवडणूक आयोग या दोन राज्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा सोबत निवडणूक घेण्यास सक्षम नाही का,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट देऊन भाजप आणि सरकार कोणता संदेश देऊ इच्छित आहे, असा प्रश्न करत खेडा म्हणाले की, गेल्या ३ महिन्यांमध्ये १५ लाख रोजगार गेले. २० लाख कोटी स्टॉक मार्केटमध्ये बुडाले. अनेक कारखाने बंद झाले. अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही हे सरकार कॉर्पोरेट करात सवलत दिल्याचा आनंद साजरा करत आहे. याच मुद्दयांवर पक्ष जनतेमध्ये जाईल. सरकारला उत्तरे मागेल, असे खेडा यांनी स्पष्ट केले. ज्या ११ अधिकाऱ्यांनी फाईलवर स्वाक्षरी केली, त्यांच्यापैकी कोणावर काय कारवाई झाली?असा प्रश्न करत कॉँग्रेसने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची बाजू उचलून धरली. सरकार केवळ वचपा काढण्याच्या भावनेतून चिदंबरम यांची नाचक्की होईल, असे पाहत आहे. तसे नसते तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधातही तपास यंत्रणांनी गुन्हे दाखल केले असते. सर्वांना समान न्यायाच्या तराजूमध्ये ठेवून एखाद्या निर्णयापर्यंत सरकार पोहोचले असते, असे खेडा यांनी म्हटले आहे.