राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह नाही; बचावासाठी सरसावले काँग्रेस नेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 14:17 IST2019-05-25T14:15:39+5:302019-05-25T14:17:30+5:30
काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत.

राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह नाही; बचावासाठी सरसावले काँग्रेस नेते
नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 2014 च्या निवडणुकीपेक्षाही मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 302 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला 350 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. अवघ्या 52 जागांवर काँग्रेस विजयी झालं आहे तर काही राज्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.
काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना कमलनाथ यांनी सांगितले की, काँग्रेसला आपलं म्हणणं लोकांपर्यत पोहचविण्यासाठी पूर्णपणे यशस्वी ठरू शकली नाही. प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात आणण्यासोबत पक्षात जबाबदारी देण्यास उशीर झाला. प्रियंका गांधी यांना खूप आधी काँग्रेसच्या प्रचारात उतरवलं जाऊ शकत होतं.
मध्य प्रदेशात काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा निवडणूक प्रचार जोरात होता. नरेंद्र मोदी यांचे म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं गेले मात्र काँग्रेसला अपेक्षितपणे तसं करता आलं नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत आणि राहतील असं कमलनाथ यांनी सांगितले.
न्याय आणण्यास झाला उशीर
काँग्रेसने न्याय योजना गरिब लोकांसाठी आणली मात्र ही आणण्यास काँग्रेसला उशीर झाला. आम्ही ही योजना प्रचारात पहिली आणू शकलो असतो पण त्याला उशीर झाला. भाजपाच्या प्रचारात ही योजना फक्त निवडणुकीचं आश्वासन म्हणून राहिली.
भोपाळ लोकसभा मतदारसंघात दिग्विजय सिंह यांचा पराभव केवळ हिंदूत्ववादी मुद्द्यामुळे झाला. विभाजनाच्या वातावरणात लोकांनी इतर मुद्दे विसरून फक्त हिंदू म्हणून मतं दिली. महात्मा गांधी यांची विचारधारा हरली आणि गोडसे विचारधारा जिंकली हे चिंता करण्यासारखं आहे असं कमलनाथ यांनी सांगितले.