“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:47 IST2025-07-09T17:44:26+5:302025-07-09T17:47:52+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली. त्याचा तपास झालेला नाही. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कूठून आले, कुठे गेले याचा तपास झालेला नाही. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झालेली आहे आणि ही मतचोरी लपवण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग नियम बदलत आहेत. महाराष्ट्रातील तोच मतचोरीचा पॅटर्न आता बिहारमध्ये राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नंतर तोच पॅटर्न भाजपा सर्व देशात वापरू शकतो. लोकशाहीत निवडणुका या निष्पक्षपाती झाल्या पाहिजेत पण निवडणुक आयोगच सत्ताधारी भाजपासाठी काम करत असल्याचे चित्र आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये हर्षवर्धन सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत
पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली पण त्याचा अद्याप तपास झालेला नाही. ४० जवान शहीद झाले, ३०० किलो स्फोटके कुठून आली त्याचा तपास लागलेला नाही. हल्लेखोर सापडले नाहीत. आणि आता पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन निष्पाप २६ पर्यटकांना ठार करून अतिरेकी निवांत परत जातात. ते कूठून आले व कुठे गेले याचा तपास झालेला नाही. चुकीची रेखाचित्रे प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल केली. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत, याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, गिरणी कामगारांच्या मोर्चावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोकांच्या मागण्या ऐकून घेणे आणि त्याचा सहानुभूतीने विचार करणे गरजेच आहे. पण भाजपा सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही. त्यांना फक्त बिल्डर व उद्योगपतींशी चर्चा करण्यातच जास्त रस आहे. मुक्या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारने यातून बाहेर यावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.