खराब हवामानामुळे ममता बॅनर्जीचे विमान तासभर हवेतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:32 IST2026-03-27T08:32:58+5:302026-03-27T08:32:58+5:30
काही काळासाठी विमानतळावरील सर्वच विमान वाहतूक विस्कळीत झाली होती.

खराब हवामानामुळे ममता बॅनर्जीचे विमान तासभर हवेतच
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाला गुरुवारी कोलकात्यात खराब हवामानाचा मोठा फटका बसला. मुसळधार पाऊस व वेगवान वाऱ्यांमुळे मुख्यमंत्र्यांचे विमान नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू शकले नाही, परिणामी त्यांना तब्बल एक तास हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. या संकटामुळे विमानतळ प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आणि काही काळासाठी विमानतळावरील सर्वच विमान वाहतूक विस्कळीत झाली होती.
आकाशातच घिरट्या
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील अंडाल येथे निवडणूक रॅली आटोपून चार्टर्ड विमानाने कोलकात्याला परतत होत्या. दुपारी ३:३० वाजता अंडाल विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान साधारण ४ वाजता कोलकात्यात लैंडिंग करणे अपेक्षित होते. मात्र, त्याच वेळी कोलकात्यात अचानक हवामान बदलले आणि विजांच्त्या कडकडाटासह पावसाने जोर धरला. दृश्यमानता कमी झाल्याने व वाऱ्याचा वेग वाढल्याने वैमानिकाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. हवामानात सुधारणा होईपर्यंत मुख्यमंत्र्यांचे विमान तासाभरापेक्षा जास्त वेळ आकाशातच घिरट्या घालत होते. अखेर सायं. ५:१९ वाजता हे विमान धावपट्टीवर उतरले.
१३ लाख 'विचाराधीन' मतदार वगळले
पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान 'विचाराधीन' श्रेणीत ठेवलेल्या ३२ लाख मतदारांची छाननी करण्यात आली असून, त्यापैकी ४० टक्के मतदार वगळण्यात आले, असे निवडणूक आयोगाने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्यक्ष आकडेवारीनुसार, न्यायालयीन प्रक्रियेनंतर वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या सध्या १३ लाख आहे. एसआयआरदरम्यान राज्यातील मतदार यादीतून अंदाजे ६३ लाख नावे आधीच वगळली होती. वगळलेल्या मतदारांची एकूण संख्या ७६ लाख झाली आहे.
तामिळनाडूत प्रचाराला वेग
चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीला महिना शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले असून प्रमुख पक्षांनी आपापल्या रणनीतीला अंतिम रूप दिले आहे. राज्यातील विरोधी पक्ष अण्णा द्रमुकचे जागावाटप जलदगतीने पूर्ण करत प्रचाराला सुरुवात केली असून सत्ताधारी द्रमुक पक्षाविरुद्ध थेट लढतीची तयारी केली आहे.